आटपाडीत तीन ठिकाणी चोरी
सांगलीः (आटपाडी)
आटपाडी शहरातील ग्रामीण रूग्णालयासमोरच्या भागात सलग दोन दिवसात तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. रविवारी व्हीएनएस ग्रुपच्या गोविंद पार्कचे कार्यालय फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, धनादेश, डीव्हीआर, राऊटरसह अन्य साहित्य लंपास केले.
आटपाडी तालुक्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. ग्रामीण रूग्णालयासमोरील विठ्ठलनगर परिसरावर चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मुख्य रस्त्यालगत असलेल्या गोविंद पार्कच्या कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तत्पुर्वी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. आतमधील तिजोरी फोडून त्यातून रोख रक्कम, जागेच्या व्यवहारासंबंधीचे विविध धनादेश, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, राऊटर, दस्तऐवजाची माहिती असलेले पेन ड्राईव्हसह अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले.
त्यानंतर चोरट्यांनी मागील बाजूस असलेल्या दरवाजा उघडून पोबारा केला. ही चोरी करताना चोरट्यांनी शेजारच्या सर्जेराव चव्हाण यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजांना बाहेरून कडी घातली होती. तत्पुर्वी चोरट्यांनी सिध्दनाथ सेल्समधील बाहेर काढुन टाकलेले विविध प्रकारचे साहित्य लंपास केले होते. त्यावेळी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मध्यरात्री हटकल्यानंतर चोरट्यांनी पोबारा केला. दोनच दिवसापूर्वी या परिसरात राहणाऱ्या सरगर वकिलांच्या घरातून चोरट्यांनी रोकड लंपास केली होती.
सलग तीन-चार ठिकाणी विठ्ठलनगर, ग्रामीण रूग्णालयाच्या भागातच चोरीच्या घटना घडत असल्याने खळबळ माजली आहे. चोरीची माहिती मिळताच शिवजल व्हीएनएस ग्रुपचे उपाध्यक्ष राहुल देशमुख, आबासाहेब जाधव, विजय चव्हाण, संजय चव्हाण, मासाळवाडीचे उपसरपंच राहुल मासाळ, पोलीस दादासाहेब ठोंबरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांनी या चोऱ्यांना आळा घालून रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.