आणखी तिघांना ‘भारतरत्न’
चौधरी चरणसिंग, पी. व्ही. नरसिंह राव, स्वामीनाथन यांच्या कार्याचा गौरव : केंद्र सरकारकडून घेषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिवंगत माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि कृषीतज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन या तीन मान्यवरांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने गौरविण्यात येणार आहे. या तिघांनाही हा पुरस्कार मरणोत्तर स्वरुपात मिळणार आहे. केंद्र सरकारने ही घोषणा शुक्रवारी केली आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
नुकताच भारतरत्न जाहीर झालेल्या तिन्ही प्रख्यात व्यक्तिमत्त्वांनी आपापल्या क्षेत्रात असामान्य कामगिरी केली आहे. कृषी, शेतकरी कल्याण, राष्ट्रनिर्माण आणि आर्थिक सुधारणा क्षेत्रात या तिन्ही नेत्यांचे अतुलनीय योगदान होते. त्यांच्या या अजोड कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी त्यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, असे केंद्र सरकारने एका विशेष निवेदनाद्वारे शुक्रवारी घोषित केले आहे.
चौधरी चरणसिंग : शेतकऱ्यांचे हितैषी
उत्तर प्रदेशातील नेते चौधरी चरणसिंग यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केले. कृषी क्षेत्रातील सुधारणा आणि शेतकऱ्यांचे अधिकार या मुद्द्यांवर त्यांनी अनेकदा संघर्ष केला. ते भारताचे काही काळ पंतप्रधानही होते. तसेच ते दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी पुकारुन लोकांच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली केली होती. तेव्हा चरणसिंग यांनी आणीबाणीविरोधात आंदोलनात भाग घेतला होता. त्यांना 19 महिन्यांचा कारावासही भोगावा लागला होता. उत्तर प्रदेश आणि भारताच्या सर्वात महान नेत्यांपैकी ते एक मानले जातात. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.
नरसिंह राव : आर्थिक सुधारणांचे शिल्पकार
1991 मध्ये देशाचे पंतप्रधान झालेले पी. व्ही. नरसिंहराव हे आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी आपल्या कार्यकाळात मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि ठोस पावले उचलली. त्यांच्या या मुक्त आर्थिक धोरणाचा भारताला मोठाच लाभ झाला आणि मंदावलेली अर्थव्यवस्था सावरली गेलाr. त्यांच्या काळात भारताची बाजारपेठ जगासाठी मुक्त झाली आणि भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला. त्यांनी भारताच्या परराष्ट्र व्यवहार धोरणातही व्यापक परिवर्तन केले. त्यामुळे भारत पाश्चिमात्य जगाच्या अधिक नजीक आला. या असामान्य कामगिरीमुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.
स्वामीनाथन : कृषीक्रांतीचे उद्गाते
भारताची अन्नसुरक्षा आणि कृषी क्षेत्रामधील अमूलाग्र परिवर्तनाचे श्रेय डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना दिले जाते. त्यांचा उल्लेख यथार्थपणे भारताच्या हरित क्रांतीचे पिता असा केला जातो. कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे भारत आज अन्नधान्यांच्या संदर्भात स्वयंपूर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संशोधन आणि तंत्रज्ञानविकास या क्षेत्रांमध्ये पुढे आले पाहिजे यासाठी त्यांनी अनेक अभिनव योजना सादर केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांचा मोठा प्रभाव असून केंद्र सरकारची कृषी धोरणे त्यांच्या संकल्पनांशी अनुकूल अशी आहेत. कृषी क्षेत्रातील असामान्य कर्तृत्वामुळे त्यांची निवड झाली आहे.
यंदा पाच जणांना भारतरत्न
यावर्षी केंद्र सरकारने पाच मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. यावर्षी घोषित करण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कार मानकऱ्यांमध्ये लालकृष्ण अडवाणी यांचा अपवाद वगळता इतर सर्व मान्यवर मृत्यू पावलेले आहेत. मात्र त्यांच्या कामगिरीचा लाभ आजही देशाला होत असल्याने त्यांना हा सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
यथोचित सन्मान
ड पुरस्कार घोषित करण्यात आलेल्या मान्यवरांचा देशनिर्मितीत महत्त्वाचा वाटा
ड चरणसिंग आणि डॉ. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रामधील योगदान अतिमहान
ड पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मुक्त अर्थव्यवस्था धोरणाने देशाची मोठी प्रगती
ड या तिन्ही मान्यवरांच्या कार्याचा केंद्र सरकारच्या धोरणांवर असाधारण प्रभाव