आसाममध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका
काँग्रेस अध्यक्षांचे केंद्रीय गृह मंत्र्यांना पत्र : झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आसाममध्ये राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दोन पानी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’तील सुरक्षेच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. 18 जानेवारी रोजी यात्रा आसाममध्ये दाखल झाली होती. तेव्हा पोलिसांनी यात्रेसाठी सुरक्षित मार्ग निश्चित करण्याऐस्वजी शिवसागर जिल्ह्dयातील अमगुरी येथे भाजपच्या पोस्टर्सची सुरक्षा करण्यास प्राथमिकता दिली होती. तर दुसऱ्या दिवशी भाजपशी संबंधित लोकांनी लखीमपूर जिलह्यात यात्रेशी संबंधित पोस्टर्स फाडली होती. आसाममध्ये राहुल गांधी यांना धोका निर्माण झाला असल्याचे खर्गे यांनी पत्रात नमूद केले आहे.
21 जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशातून यात्रा आसाममध्ये परतल्यावर सोनितपूर येथे आणखी एक हल्ला झाला. सोनितपूरचे पोलीस अधीक्षक हे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांचे बंधू आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमवर हल्ला केला तसेच गैरवर्तन केल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे.
त्याचदिवशी सोनितपूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा ताफा रोखला. तसेच आसाम काँग्रेस अध्यक्ष भूपेन बोरा यांच्यावर हल्ला केला. 22 जानेवारी रोजी भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा राहुल गांधींचा ताफा रोखला तर नागांव जिल्ह्यात अत्यंत असुरक्षित स्थिती निर्माण केली होती. या गोंधळादरम्यान आसाम पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने राहुल गांधी यांची सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे.
या सर्व घटना घडूनही अद्याप कुणालाच अटक करण्यात आलेली नाही. तसेच अनेक प्रकरणांमध्ये तर तपासही सुरू करण्यात आलेला नाही. जोखिम वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी आम्ही करत आहोत असे खर्गे यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच त्यांनी राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.
याचदरम्यान आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्वावर हिंसा, चिथावणी देणे आणि सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचविण्याचा आरोप आहे. काँग्रेस समर्थकांनी मंगळवारी पोलिसांसोबत झटापट केली होती. तत्पूर्वी प्रशासनाने गुवाहाटी शहरात वाहतूक कोंडी होणार असल्याचे कारण देत भारत जोडो यात्रेला शहरात प्रवेश करण्याची अनुमती नाकारली होती.