पंचवीस वर्षांनंतर सक्रीय झालेल्यांनी श्रीपादभाऊंचा विकास अहवाल वाचावा
भाजपचे अहवाल पुस्तिकेद्वारे सडेतोड उत्तर : पंचवीस वर्षांत राबविलेल्या विकासकामांची यादी
पणजी : गेल्या 25 वर्षांच्या खासदारकीच्या काळात आपण उत्तर गोव्यात कोट्यावधी ऊपये खर्च करून कामे केली आहेत. मंत्रीपद मिळाले तेव्हा देशभरात कामे केली आहेत, असे केंद्रीय मंत्री तथा भाजपचे उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांचा अहवाल आपण सादर करीत आहे. जे लोक 25 वर्षांनंतर राजकारणात सक्रीय झाले आहेत, त्यांना कदाचित भवतालची माहिती नसेल, त्यांनी हा अहवाल अवश्य वाचावा, जेणेकरून त्यांना झालेला भ्रम दूर होईल, असेही श्रीपाद नाईक म्हणाले. सोमवारी येथील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सदानंद शेट तानावडे, दामू नाईक, सिद्धार्थ कुंकळकर उपस्थित होते. गेल्या 25 वर्षांमध्ये खासदार म्हणून उत्तर गोव्यात आणि केंद्रीय मंत्री या नात्याने राज्यभरात केलेल्या विकास कामांचा अहवाल सोमवारी भाजपने जारी केला.
उत्तर गोव्यात राबविले 1476 प्रकल्प
गेल्या दहा वर्षांत एकूण 1 हजार 476 प्रकल्प गोव्यात आणले. त्यातील 1 हजार 171 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. इतर प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आपल्यावर टीका करणारे विरोधक 25 वर्षे उत्तर गोव्यात फिरलेलेच नाहीत. त्यामुळे आपण केलेला विकास त्यांना दिसत नाही, असे नाईक म्हणाले.
श्रीपादभाऊंनी वाचला विकासकामांचा पाढा
1999 मध्ये आपण सर्वप्रथम खासदार म्हणून लोकसभेत पोहोचलो. तेव्हापासून आतापर्यंत खासदार म्हणून मिळालेल्या निधीचा उत्तर गोव्यात पुरेपूर वापर केला आहे. स्मशानभूमींपासून ते मल्टिपर्पज सभागृहांपर्यंत कोट्यावधी ऊपयांचे प्रकल्प उभारले आहेत. या काळात आपल्याला अनेकदा केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. त्याचा फायदा बांबोळीतील सुपरस्पेशालिटी ब्लॉक, धारगळमधील आयुष इस्पितळ, रायबंदर येथील आयुष आरोग्य सेवा केंद्र, मुरगावातील बंदर इमारत, दोनापावलातील राष्ट्रीय जलक्रीडा प्रकल्प, स्वदेश दर्शन योजने अंतर्गत राज्यातील वारसास्थळे आणि पर्यटनस्थळांचा विकास, राज्यातील रेल्वे स्थानकांचे विस्तारीकरण अशी अनेक कामे आपण केलेली आहेत, असेही मंत्री नाईक यांनी नमूद केले.
आयुष इस्पितळात 370 जणांना नोकऱ्या
नोकऱ्या आम्ही देत नसतो, जो पात्र असेल त्याला नोकरी मिळते. राज्यात वेगवेगळे प्रकल्प आणून नोकऱ्या तयार करण्याचे काम आम्ही करीत असतो. तसेच त्या नोकरीला पात्र होण्यासाठी जे प्रशिक्षण लागते तेही उपलब्ध करून देतो. प्रत्येकाच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत असते. राज्यात आयुर्वेदिक शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्थेतून शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना नोकरी उपलब्ध व्हावी म्हणून आयुष इस्पितळे सुरू करण्यात आली तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक उपचार सुरू करण्यात आले आहेत. धारगळ येथील आयुष इस्पितळात एकूण 370 नोकऱ्या पात्र उमेदवारांना मिळाल्या. तसेच पेडणेतील 150 लोकांना आयुष इस्पितळात नोकऱ्या मिळाल्या आहेत, असेही श्रीपाद नाईक म्हणाले.
मतदारांना आहे माझ्या कामांची माहिती
आपण खासदार किंवा मंत्री झाल्यानंतर काय केले याची माझ्या मतदारांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे गेल्या पाच निवडणुकीत त्यांनी मला पूर्ण पाठींबा दिला आहे. या खेपेसही देतील यात शंका नाही. उत्तर गोव्यात एकदा निवडून आलेला उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही, मात्र आपण पाच वेळा निवडून आलेलो आहे. हे साध्य झाले केवळ माझ्या मतदारांच्या सहकार्यामुळे. मतदारांचा पाठींबा मला होता आणि पुढेही तो तसाच राहू दे असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले आहे.
वायफळ टीका करणाऱ्यांनी अहवाल वाचावा
केंद्रीय मंत्री तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी गेल्या 25 वर्षांत गोव्याचा विकास घडवून आणण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी केंद्रातून विविध प्रकल्प मंजूर करून गोव्यात आणले. त्यांच्यावर टीका, आरोप करणाऱ्या विरोधकांनी भाजपने प्रसिद्ध केलेला अहवाल निश्चित वाचावा. त्यानंतर त्यांना श्रीपाद नाईक यांच्या कामाची माहिती मिळेल, असे राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.