इंफाळ खोऱ्यातील बंडखोर गटासोबत शांतता करार होणार
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूर हिंसेप्रकरणी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मोठा दावा केला आहे. शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकत आहोत. लवकरच आम्ही एका मोठ्या बंडखोर गटासोबत शांतता करारावर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा करत आहोत. मणिपूर हिंसेनंतर राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकार अनेक मोठी पावले उचलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बंडखोर गटासोबत शांतता करारासंबंधी आमची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरीही त्यांनी कुठल्याही गटाचे नाव घेतलेले नाही. 3 मे रोजी मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसेनंतर राज्य सराकर सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर स्वत:ची बाजू मांडत आहे. परंतु राज्य सरकारने पहिल्यांदाच अशाप्रकारच्या चर्चेची अधिकृत पुष्टी दिली आहे. यापूर्वी राज्य सरकार प्रतिबंधित युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (युएनएलएफ) एका गटासोबत चर्चा करत असल्याचे बोलले जात होते.