कर्मचारी नियुक्ती प्रकरणाचीही होणार चौकशी
लोकायुक्तांनी मनपाकडून मागविला संपूर्ण अहवाल : चौकशी झाल्यास निश्चितच गैरप्रकार येणार उघडकीस
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये 155 कर्मचाऱ्यांना नियुक्त करून घेण्यात आले. त्यांना सरकारनेच नियुक्त केले आहे. असे असताना त्यांच्याकडे 1 ते 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. त्याची दखलही लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हणमंत राय यांनी घेतली आहे. त्याबाबतही योग्य तो खुलासा करावा, असे त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महानगरपालिकेमध्ये विविध प्रकल्प, तसेच कामे करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेकवेळा झाला आहे. याबाबत काहीजणांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही सफाई कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपातील कारभाराबद्दल लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे लोकायुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.
एकाचवेळी 5 ते 6 पथके तयार करून महानगरपालिकेला धडक मारली. यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. नेमके काय घडले आहे, हेच समजणे अवघड झाले होते. जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी दहा रुपये घेतले जातात, अशी तक्रारही करण्यात आली होती. त्याचीही चौकशी करण्यात आली. याचबरोबर 155 कर्मचाऱ्यांकडून नियुक्तीपत्रासाठी 1 ते 2 लाख रुपये मागणी सुरू आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लोकायुक्तांनी चर्चा केली आहे. याबाबतचा संपूर्ण अहवाल द्यावा, असे लोकायुक्तांनी स्पष्ट केले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्त करतानाच एक वर्षापूर्वी मोठी रक्कम उकळल्याची चर्चा सुरू होती. त्यामध्ये काही नगरसेवक व अधिकारीही सामील होते. या प्रकरणाबाबत विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठविला होता. त्यानंतर सरकारने या कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी नियुक्ती केली व पूर्वी केलेला भ्रष्टाचार लपविल्याची चर्चा सध्या सुरू आहे. एकूणच सफाई कर्मचारी नियुक्ती प्रकरणाची लोकायुक्तांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.