तिकीट दरात बदल नाही
वृत्तसंस्था / मुंबई
येथील वानखेडे स्टेडियमवर 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरी क्रिकेट कसोटी खेळविली जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी तिकीट दरामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.
वानखेडे स्टेडियमवर यापूर्वी म्हणजे 2021 साली भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळविला गेला होता आणि भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी दणदणीत पराभव केला होता. या सामन्यावेळी शौकिनांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या तिकीटांचा दर नोव्हेंबरच्या कसोटीसाठी कायम ठेवण्यात आला आहे. या सामन्यासाठी प्रत्येक दिवसाकरता तिकीटाचे दर 125 रुपये असून पाच दिवसांसाठी तिकीटाचा दर 300 रुपये राहिल. मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुंबई क्रिकेट संघटनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आगामी 19 जानेवारीला वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट संघटनेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे.