ओडिशात भाजप-बिजद युती नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांची युती होणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. गेले दोन महिने या दोन पक्षांमध्ये युतीसंबंधी चर्चा केली जात होती. तथापि, अंतिमत: स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साधारणत: 15 वर्षांपूर्वी या दोन्ही पक्षांची युती होती. तथापि, नंतर बिजू जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रदीर्घ कालावधी दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्याच लढले होते. पूर्वीचे हे दोन मित्रपक्ष आता पुन्हा जवळ येतील अशी चर्चा होती. तथापि, युती न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला अशी सूत्रांची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मनमोहन सामाल यांनी युती होणार नसल्याची घोषणा शुक्रवारी केली.
सध्याची परिस्थिती
ओडिशात लोकसभेच्या 21 जागा असून सध्या त्यांच्यापैकी 8 जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. तर उरलेल्या जागा बिजू जनता दलाकडे आहेत. युती न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने पूर्ण विचार करून आणि जमिनीवरील परिस्थिती समजून घेऊन घेतला आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध संस्था यांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाला अनुकूल परिस्थिती आहे, असा पक्षाचा विश्वास आहे. त्यामुळे युती करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
काही जागांसंबंधी एकमत नाही
जगन्नाथ पुरी आणि भुवनेश्वर या दोन लोकसभा जागांवर एकमत न झाल्याने युती होऊ शकली नाही, अशी चर्चा आहे. तसेच काही विधानसभा जागांवरही एकमत झाले नाही. 2019 च्या निवडणुकांपेक्षा सध्या जास्त अनुकूल वातावरण आहे, असा दोन्ही पक्षांचा विश्वास आहे. प्रमुख लढत याच दोन पक्षांमध्ये होणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या राज्यात सध्या काँग्रेस दुर्बल अवस्थेत आहे, असे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र, अद्याप दोन्ही पक्षांनी सर्व उमेदवार निश्चित केलेले नाहीत.