...तर जनता गप्प बसणार नाही
विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा इशारा : संपूर्ण गोव्यात भाजपचे वातावरण असल्याचा दावा
मडगाव : भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधानावर घाला घालणार असल्याची विधाने करून लोकांची दिशाभूल करतात, त्यांनी अगोदर आमदारांचा आदर करायला शिकले पाहिजे. नको असलेली विधाने करू नये. गोव्यातील जनता अशा लोकांना गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मडगावात दिला. मगोचे आमदार जीत आरोलकर यांच्यावर टीका करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांना ‘लापीट’ म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील इशारा दिला आहे. विरोधकांचे तोंड वायफळ सुटलेले आहे. ते अगोदर त्यांनी बंद केले पाहिजे. एखाद्या आमदारावर नाहक टीका करतात, त्यांनी गैर संसदीय शब्दाचा वापर करू नये. त्यांचा तोल ढासळला आहे. त्यामुळे गैर संसदीय भाषेचा वापर केला जात आहे. त्यांना कळून चुकले आहे की, दक्षिण गोव्यातही काँग्रेसचा पराभव होत आहे. संपूर्ण गोव्यात भाजपचे वातावरण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांना हे विधान कुणाला उद्देशून करता असा सवाल केला असता, मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांनी कोणी गैर संसदीय शब्दाचा वापर केला आहे, त्याला उद्देशून हे आपले विधान आहे. आमदार जीत आरोलकर यांना लापीट म्हटल्याबद्दल त्यामुळे मांद्रे व पेडणे मतदारसंघात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच भंडारी समाजाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. भाजपने देशात ‘राम राज्य’ आणले ज्यांनी राम सेतू मोडण्यासाठी प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यांनी रामनवमीचे महत्त्व आम्हाला सांगण्याची जरूरी नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
आता जनतेने गॅरंटी द्यावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर संपूर्ण देशाच्या व गोव्याच्या विकासाची गॅरंटी देत असतील तर गोव्यातील जनतेने देखील दक्षिण व उत्तर गोव्यातील दोन्ही उमेदवार बहुसंख्य मतांनी निवडून देऊन मोदीजींना गॅरंटी दिली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.