... तर ते भारताचे नवे स्वातंत्र्य असेल
केंद्रीय मंत्री गडकरी यांचे ‘सागर मंथन ’मध्ये प्रतिपादन : पेट्रोल, डिझेलची आयात बंद होईल तेव्हा ते नवे स्वातंत्र्य
मडगाव : निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे हा ‘स्वदेशी’साठीचा नवा मार्ग आहे. जेव्हा पेट्रोल किंवा डिझेलचा एक थेंबही आयात केला जाणार नाही तेव्हा भारतासाठी ते ‘नवे स्वातंत्र्य’ असेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल रविवारी सांगितले. ‘पांचजन्य’ साप्ताहिकाने आयोजित केलेल्या ‘सागर मंथन 2.0’ कार्यक्रमात संबोधित करताना मंत्री पुढे म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे जगातील दहशतवादाला अटकाव करण्याशी जोडलेले आहे. ‘जोपर्यंत ही आयात थांबत नाही तोपर्यंत जगभरातील दहशतवाद थांबणार नाही. पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. पेट्रोल आणि डिझेलचा एक थेंबही जेव्हा आयात होणार नाही तेव्हा ते भारताचे नवे स्वातंत्र्य असेल असे मी मानतो’, असे ते म्हणाले.
... तर हा पैसा गरीबांकडे येईल
‘पेट्रोल आणि डिझेलचे आयात बिल आता 16 लाख कोटी ऊपयांवर पोहोचले आहे. जर आपण ही आयात कमी केली, तर आपण वाचवलेला पैसा गरिबांकडे जाईल. म्हणूनच आम्ही ‘बायो फ्युएल’सारखे पर्यायी इंधन आणले आहे. आयात कमी करून निर्यात वाढविणे हा देशभक्ती आणि स्वदेशीसाठीचा नवा मार्ग आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सर्वाधिक जीएसटी देणारा उद्योग
गडकरी म्हणाले की, 2014 मध्ये त्यांनी ताबा घेतला तेव्हा भारतातील वाहन उद्योगाचा आकार 7 लाख कोटी ऊपये होता आणि आता तो 12.5 लाख कोटी ऊपये झालेला आहे. हे क्षेत्र 4.5 कोटी लोकांना रोजगार देते. राज्य सरकारे आणि केंद्राला सर्वाधिक जीएसटी देणारा हा उद्योग आहे, असेही ते म्हणाले.
पाच वर्षांत भारतीय उद्योग पहिल्या स्थानी
देशाचा वाहन उद्योग येत्या पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास व्यक्त करून गडकरी म्हणाले की, वाहन उद्योगात सर्वाधिक आयात होत आहे. जर आपल्याला विश्वगुरू आणि पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था व्हायचे असेल, तर आपल्याला निर्यातीत अग्रस्थानावर जावे लागेल, असे गडकरी यांनी सागितले.
जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर झेप
तीन महिन्यांपूर्वी भारताने वाहन निर्यात क्षेत्रात जपानसारख्या देशाला मागे टाकत सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे. ‘मी तुम्हाला सांगू शकतो की, आम्ही आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारत) आणि सुशासन (सुशासन) यासारख्या आमच्या उपक्रमांच्या आधारे पुढील पाच वर्षांत प्रथम क्रमांकावर असू’, असा दावा गडकरी यांनी केला.