सनातन धर्माचा नाश हेच त्यांचे ध्येय !
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये दलीत, आदीवासी आणि मागासवर्गीय हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारने हिंदू मंदिरांवर जिझियासारखा कर बसविला आहे. यावरुन सनातन धर्म नष्ट करणे हेच विरोधकांचे ध्येय असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी जळजळीत टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विरोधकांना यासंबंधी चांगलेच धारेवर धरले.
संदेशखालीत स्थिती भयानक
पश्चिम बंगालच्या 24 परगाणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे परिस्थिती भयानक आहे. दलित आणि आदीवासी हिंदू महिलांवर अत्याचार पेले जात आहेत. या समाजांमधील लोकांची घरे आणि जमीनी बळकाविल्या जात आहेत. हे सर्व त्या राज्यात सत्ताधारी असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. त्यांचा सूत्रधार शहाजहान शेख याच्यावर तेथील महिलांनीच गंभीर आरोप केले आहेत. तरीही त्यांची दखल घेतली जात नाही. कारण विरोधी पक्षाच्या नेत्यांना सनातन धर्माचे लोकही आता नकोसे वाटत आहेत, अशी कठोर टिप्पणी त्यांनी केली.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये झपाट्याने राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे. बहुसंख्याक समाजावर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अन्याय केला जात आहे. विरोधी पक्षांशी संबंधित असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांकडून ईडी अधिकाऱ्यांवरही हल्ले केले जाण्याचे प्रकार घडले आहेत. ही सर्व स्थिती देशाला अराजकाकडे घेऊन जाईल. त्यामुळे मतदारांनी सावधपणे आपल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करावा, अशा अर्थाची विधाने त्यांनी केली.
ती निंदा केवळ शाब्दीक नव्हती...
काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या काही नेत्यांनी सनातन धर्मावर अतिशय गलिच्छ आणि अर्वाच्य शब्दांमध्ये धादांत खोटी टीका केली होती. सनातन धर्माला त्यांनी कोरोना, महारोग, प्लेगच्या जंतूंची उपमा दिली होती. पण तो केवळ शाब्दीक मारा नव्हता. आज विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये जे घडत आहे, त्यावरुन सनातन धर्म संपविण्याची प्रत्यक्ष कृती विरोधी पक्षांकडून होत आहे, हे स्पष्ट होत आहे, असाही भडिमार त्रिवेदी यांनी केला आहे.