सीमाप्रश्नाच्या लढ्याची जबाबदारी तरुणांनी खांद्यावर घ्यावी
एम. टी. आंबोळकर यांचे प्रतिपादन : वाघवडे येथील बैठकीला तऊणांचा प्रतिसाद
वार्ताहर /किणये
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमच्या वडिलधारी लोकांनी तुरुंगवास भोगला आहे. काही जणांनी लाठ्या खाल्लेल्या आहेत. काहीजण हुतात्मे झालेले आहेत. गेल्या 68 वर्षापासून हा सीमाप्रश्नाचा संघर्षाचा लढा सुरू आहे. आमची लढाई मराठी भाषा-संस्कृती जतनाची आहे. इतक्या वर्षापासून आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठी धडपडतो आहे. आता सीमाप्रश्नाच्या लढाईची जबाबदारी तरुणांनी आपल्या खांद्यावर घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुण संघटित झाला तरच या लढाईला अधिक बळकटी मिळणार आहे, असे मनोगत निवृत्त शिक्षक एम. टी. आंबोळकर यांनी वाघवडे येथे व्यक्त केले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी वाघवडे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक व गावसंपर्क अभियान याबद्दल चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील हे होते. यावेळी मार्गदर्शन करताना आंबोळकर बोलत होते.
पश्चिम भाग हा समितीचा बालेकिल्ला
पश्चिमभाग हा समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. वाघवडे गावातील नागरिकांचा व तरुणांचा नेहमीच समितीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा राहिलेला आहे. यापुढेही समितीच्या झेंड्याखाली वाघवडे गावातून चांगल्या प्रमाणात प्रतिसाद राहील, असे आर. के. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले. गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्याच्या विविध गावांमध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने गावसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. काही गावांमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. मात्र सर्वाधिक तऊणांची गर्दी वाघवडे गावातील बैठकीला दिसून आली. त्यामुळे या गावातील तरुणांचा चांगला प्रतिसाद असल्याचे जाणवले. व्यासपीठावर जोतिबा ना. आंबोळकर, सोपाना नाईक, नारायण पाटील, दयानंद देसाई, आर. एम. चौगुले आदींसह समितीचे नेतेमंडळी उपस्थित होते. या बैठकीला दीपक आंबोळकर, सुनील पाटील, नागेशी आंबोळकर, नारायण कुपुटकर, मंगेश पाटील, गावडू पाटील, रघुनाथ देसाई, संतोष आंबोळकर, राजू दिवटगे आदींसह सुमारे सत्तरहून अधिक तऊण कार्यकर्ते उपस्थित होते.