अहंकाराचा वारा । न लागो राजसा
अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, मनुष्याच्या आचरणातूनच त्याची कीर्ती चोहीकडे पसरत असते. सद्गुरूंच्या आचरणामुळे त्यांचा शिष्य परिवार न बोलावताही गोळा होत असतो. त्यांच्या बोलण्यातला शब्द आणि शब्द ते टिपून घेत असतात. त्यांनी सहज काहीतरी सांगितले तरी त्यात काहीना काही बोध असतोच. असं जरी असलं तरी सद्गुरुंनाही अहंकाराची बाधा होऊ शकते. हे ऐकून उद्धव चकितच झाला कारण आत्तापर्यंत त्याने ऐकल्यानुसार सद्गुरू भगवंतांना अनन्य शरण गेलेले असल्याने त्यांना अहंकाराचा वारा लागत नसतो, असे त्याला वाटत असते. अशा परिस्थितीत ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या सद्गुरुंना अहंकार होऊ शकतो हे भगवंतांनी सांगितल्यावर उद्धवाला आश्चर्य वाटले. त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव बघून भगवंत म्हणाले, लोकसंग्रह करताना, शिष्यांना उपदेश करताना सद्गुरुंना अभिमान कसा होतो आणि तो होऊ नये म्हणून काय करावे असे तू विचारत असशील तर तेही सांगतो ऐक. सद्गुरुंनी ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे ते जाणते झालेले असतात. त्यांना विशेष प्रज्ञा प्राप्त झाली असल्याने त्यांना वस्तू प्रत्यक्षात आहे तशी दिसत असते. ह्या गोष्टींमुळे आपल्याला काही विशेष शक्ती प्राप्त झाल्या आहेत हे लक्षात येऊन त्यांना त्यांच्या ज्ञानाचा अभिमान होऊ शकतो परंतु ह्या अभिमानामुळे त्यांच्या ज्ञानाचे तेज क्षीण होऊ लागते. येथे श्री गोंदवलेकर महाराजांच्या सांगण्याची आठवण होते. ते म्हणतात, अहंकार हा हरळीच्या गवतासारखा असतो.
थोडी जरी संधी मिळाली की तो फोफावतो. पुढे भगवंत म्हणाले, जोपर्यंत जाणते सद्गुरू निरहंकारी असतात तोपर्यंत त्यांच्या ज्ञानाला तेज असते. त्यामुळे त्यांची कृपा झाल्या झाल्या सच्छिष्याला बोध होतो. तुला सहज जाताजाता माझ्याकडून ज्ञानाचा उपदेश मिळालेला आहे. तो तू शिष्यांना दे. तू असे करत असताना ते तुला सन्मान देतील. तुझा आदर करतील. त्यातूनच ज्ञानाचा अभिमान होऊ शकतो म्हणून तू सदैव सावध रहा. यात एक अडचण अशी की, शिष्यांनी दिलेल्या सन्मानाचा जर तू स्वीकार केला नाहीस तर तुझे अपक्वपण दिसून येईल पण म्हणून तू त्या सन्मानाचा स्वीकार करत असताना जर तुला ज्ञानाभिमान झाला तर मात्र ते मोठेच विघ्न तुझ्यापुढे उभे राहील. म्हणून तुझ्यासारख्या ज्ञात्याने शिष्यांनी दिलेला सन्मान हा आपल्या ज्ञानाला दिलेला असून तो तुला वैयक्तिक दिलेला नाही हे लक्षात घेऊन तू तुझ्या ज्ञानाचा अभिमान धरू नकोस. हे ज्ञान्याचे लक्षण असल्याने, जो असे करेल तो खरा ज्ञानी म्हणून ओळखला जातो. तुला तर माझ्या ज्ञानाची पूर्ण प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे एकटा असताना किंवा लोकात वावरत असताना कायम निराभिमानी अवस्थेत रहा. म्हणजे तुला कायम स्वानंदाची अनुभूती येत राहील पण उद्धवा, कायम निराभिमानी राहणे सहजी शक्य होत नाही.
म्हणून तू शिष्यांना कायम निराभिमान स्थितीत राहण्याचा उपदेश कर. निराभिमानी राहण्याएव्हढी उत्तम दशा स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या तिन्ही जगतात नाही. त्यांना पुढं असं सांग की, कायम निराभिमानी राहण्यासाठी सतत देवाची आठवण ठेवा म्हणजे तो कर्ता आहे हे आपोआपच लक्षात येऊन झालेला अभिमान गळून पडेल. देवाची सतत आठवण राहण्यासाठी वाचेने त्याचे सतत नाम संकीर्तन करत रहा. त्यामुळे त्यांचे मन सतत देवाशी जोडलेले राहील. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी भगवंताचे मनोगत जाणले होते म्हणून ते म्हणतात, “अहंकाराचा वारा । न लागो राजसा। माझिया विष्णुदासा । भाविकांसी । नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्यामुखी निधन पांडुरंग । जो कायम निराभिमानी असतो त्यांची म्हणून काही खास लक्षणे असतात तीही तुला सांगून ठेवतो.
क्रमश: