आश्वासनांच्या गाजरांना कंटाळून ''या'' गावाने केली राजकारण्यांना प्रचारासाठी प्रवेशबंदी !
ग्रामस्थांनी लावला वाडीच्या प्रवेशद्वारावरच फलक ;
कुणकेरी- सरुंदेवाडी गेली २० वर्षे रस्त्याला जोडणाऱ्या पुलाच्या प्रतीक्षेत
सावंतवाडी
कुणकेरी हे सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले गाव. पण, या गावामधील सरुंदेवाडी आजही रस्त्याला पुलाच्या प्रतीक्षेत आहे.या वाडीवर जाण्यासाठीच्या मार्गात मोठा ओहोळ असल्याने या वाडीचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. मागील 20 वर्षांपासून वेळोवेळी या वाडीवरील रहिवाश्यांनी सर्वपक्षिय मंत्री, आमदार, खासदार यांना निवेदने दिली . मात्र , निवडणुकीपुरती खोटी आश्वासाने देऊन तोंडाला पाने पुसण्यापलीकडे काहीही केले नाही.
या सर्व राजकीय आश्वासाने व भूलथापांना कंटाळून येणाऱ्या लोकसभा व त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना वाडीमध्ये प्रचारासाठी येण्यास प्रवेश बंदी केली आहे. तसा फलक देखील वाडीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. असा फलक लागणे म्हणजे तथाकथित बड्या पुढाऱ्यांना सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. अशी चर्चा सर्वसामान्यातून होत आहे.