एकविसावे शतक भारतीयांचेच!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास : आंध्र प्रदेशमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन
वृत्तसंस्था/कुर्नूल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेश दौऱ्यावेळी कुर्नूल येथे 13,430 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी एकविसावे शतक हे 140 कोटी भारतीयांचेच असेल, असा विश्वास व्यक्त केला. 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करणार आहे. या टप्प्यापर्यंत आपला देश ‘विकसित भारत’ बनलेला असेल, असे मी आज आत्मविश्वासाने सांगत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आज जग भारताकडे 21 व्या शतकातील नवीन उत्पादन केंद्र म्हणून पाहत आहे. या यशाचा सर्वात मोठा पाया म्हणजे स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार होत आहे. या यशामध्ये आंध्र प्रदेशचेही मोलाचे योगदान असून हे राज्य स्वावलंबी भारताचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.
कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर भर
विकसित भारताचे ध्येय जलद गतीने साध्य करण्यासाठी देशभरात बहुआयामी पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. गावांपासून शहरांपर्यंत आणि शहरांपासून बंदरांपर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर आमचे लक्ष आहे. आमच्या सरकारचे दृष्टिकोन नागरिक-केंद्रित विकास आहे. आम्ही नवीन सुधारणांद्वारे नागरिकांचे जीवन सतत सोपे करत आहोत. देशात 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त झाले आहे. परवडणारी औषधे, परवडणारे उपचार आणि वृद्धांसाठी आयुष्मान सारख्या असंख्य फायद्यांमुळे सहजतेने जगण्याचा एक नवीन अध्याय सुरू झाल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
आंध्र प्रदेशात उत्पादन वेगाने वाढत आहे. निम्मलुरु येथील अॅडव्हान्स्ड नाईट व्हिजन फॅक्टरीचे उद्घाटन हे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. या कारखान्यामुळे नाईट व्हिजन उपकरणे, क्षेपणास्त्र सेन्सर्स आणि ड्रोन गार्ड सिस्टीम तयार करण्याची भारताची क्षमता वाढेल. येथे उत्पादित उपकरणे भारताच्या संरक्षण निर्यातीलाही चालना देतील आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण भारतीय उत्पादनांची ताकद पाहिली असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.
आंध्रात नवीन आंतरराष्ट्रीय सब-सी गेटवे
येथे एक नवीन आंतरराष्ट्रीय सब-सी गेटवे बांधले जाणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. या माध्यमातून देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील विशाखापट्टणमपर्यंत पोहोचणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय सब-सी केबल्सचा समावेश असेल. या प्रकल्पामुळे विशाखापट्टणम हे एआय आणि कनेक्टिव्हिटीचे केंद्र म्हणून स्थापित होईल. ते केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सेवा देईल. मी यासाठी आंध्र प्रदेशातील लोकांचे विशेष अभिनंदन करतो आणि चंद्राबाबू नायडू यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
श्रीशैलम येथे पूजा, ध्यानसाधना
कुर्नूल येथे पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी नंदयालला भेट दिली. याप्रसंगी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू देखील उपस्थित होते. त्यांनी श्रीशैलममधील भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानमला भेट देत पूजा आणि ध्यानसाधना केली. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंग आणि 52 शक्तीपीठांपैकी एक आहे. ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ असे दोन्ही असलेले हे एकमेव मंदिर आहे. येथील देवदर्शनानंतर पंतप्रधान मोदींनी श्रीशैलममधील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देत तेथेही प्रार्थना केली. हे एक स्मारक संकुल आहे.