सत्यशोधन पथकाला पोलिसांनी रोखले, संदेशखालीत तणाव
6 सदस्यांना पोलिसांकडून अटक : तृणमूल नेत्यांना मात्र दौऱ्याचा परवानगी
► वृत्तसंस्था/ कोलकाता
संदेशखालीतीतल तणाव वाढत चालला आहे. ग्रामस्थांच्या जमिनी बळकाविणे आणि महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार स्थानिक तृणमूल नेत्यांकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तृणमूल काँग्रेस आरोपींना वाचवू पाहत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर ममता बॅनर्जी सरकार संदेशखालीत जाण्यापासून सर्वांना रोखत असल्याचा आरोप आहे. केवळ तृणमूल नेत्यांनाच तेथे जाण्याची अनुमती आहे. याचदरम्यान भाजपचे सत्यशोधन पथक संदेशखाली जात असताना दक्षिण 24 परगण्यातील भोजेरहाटमध्ये पोलिसांनी याच्या सदस्यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालच्या संदेशखालीमध्ये स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मंत्री सुजीत बोस आणि पार्थ भौमिक यांनी तेथील दौरा केला होता. यापूर्वी शनिवारी मीनाक्षी मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वात माकपच्या एका शिष्टमंडळाला पोलिसांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये जाण्यापासून रोखले होते.
संदेशखालीत कलम 144 लागू असल्याचा दाखला देत पोलीस लोकांना तेथे जाण्यापासून रोखत आहे. भाजपच्या सत्यशोधन पथकाच्या सदस्यांना अटक करण्यात आल्यावर तेथे तणाव वाढला आहे. तर पोलिसांनी आता याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपच्या पथकाला आम्ही तेथे न जाण्याची विनंती करत होतो, परंतु तेथे अवैध स्वरुपात पोलीस बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करत होते. याचमुळे आम्हाला त्यांना अटक करावी लागली असल्याचा दावा भांगड विभागाचे पोलीस उपायुक्त सैकत घोष यांनी केला आहे.
आम्ही येथे शांततेत आंदोलन करत होतो. कारण पोलिसांनी आम्हाला अवैध स्वरुपात रोखले आहे. हे आमच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. आम्ही याप्रकरणी मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांकडे तक्रार करणार आहोत. सरकार संदेशखालीतील सत्य लपवू पाहत आहे. हे सत्य जगासमोर येऊ नये म्हणून ममता बॅनर्जी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. राज्यातील घटनात्मक व्यवस्था कोलमडली आहे. दुर्दैवने पोलीस अवैध आदेश लागू करत आहे. आम्ही केवळ संदेशखालीतील पीडितांना भेटू इच्छितो असे पथकाचे सदस्य ओ.पी. व्यास यांनी म्हटले आहे.
भाजप संतप्त
आम्ही आता राज्यपालांची भेट घेत स्थिती अवगत करून देणार आहोत. त्यानंतर दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयासमोर याविषयी भूमिका मांडू असे पथकाचे अन्य सदस्य नरसिंह रे•ाr यांनी सांगितले आहे. विजया भारतीय यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या एका पथकाने शनिवारी संदेशखालीचा दौरा केला होता. तृणमूल नेत्यांकडून जमिनी बळकाविण्यात आल्याच्या आरोपांप्रकरणी हे पथक चौकशी करत आहे.
स्थिती नंदीग्रामसारखी : अधिकारी
भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी संदेशखालीच्या स्थितीची तुलना नंदीग्रामशी केली आहे. 2007-08 मध्ये तत्कालीन डाव्या सरकारच्या बळजबरीच्या भूमी अधिग्रहणाच्या विरोधात आंदोलन चालवूनच तृणमूल काँग्रेस 2011 मध्ये सत्तेवर आला होता. संदेशखालीच स्थिती नंदीग्रामसारखीच आहे. लोकांच्या जमिनींवर कब्जा, लैंगिक शोषण आणि भागात लोकशाहीची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे.