For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची यावर्षीही बोंब

06:42 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची यावर्षीही बोंब
Advertisement

आंदोलने सुरू झाली, राजकारण्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली की समजायचे, कोकणात गणेशोत्सव जवळ आला. नेमेचि येतो पावसाळा.. या उक्तीप्रमाणे गणेशोत्सवापूर्वीच्या काळात हे दरवर्षी घडत आले आहे. या काळात उत्सवापेक्षा अधिक चर्चेत येतो, तो मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग. गेल्या 13 वर्षानंतरही हा महामार्ग अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव जवळ येऊन ठेपल्यानंतर राज्यकर्त्यांसह कोकणातील लोकप्रतिनिधींना या महामार्गाची प्रकर्षाने आठवण येते, हे सारे नेहमीचंच आहे. त्यामुळे अर्धवट महामार्गामुळे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही खाचखळग्यातून आदळत, आपटत आणि कोकण रेल्वेतून चेंगराचेंगरीत असह्या वेदना देत चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास ठरलेलाच आहे.

Advertisement

गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे कोकणातील महत्त्वाचे सण. मात्र या दोन्ही सणापैकी सर्वाधिक गणेशोत्सवाला दरवर्षी रत्ना†गरी, रायगड आा†ण सिंधुदुर्ग ा†जह्यात लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावाला येतात. यावर्षी 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे एरव्ही सुनी-सुनी असलेली गावे आणि कुलूपबंद असलेली कोकणातील घरे या उत्सवाच्या निमित्ताने आठवडाभर गजबजून जाणार आहेत. कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याने शहरांपेक्षा गावोगावच्या उत्सवात एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. कामानिमित्त मुंबईसह इतर शहरांत असणारे चाकरमानीच नव्हे तर देश-विदेशातूनही अनेकजण आपल्या गावी येत असल्याने या उत्सवाला इतर सणांपेक्षा एक वेगळाच रंग चढलेला दिसतो.

Advertisement

कोकण रेल्वे फुल्ल

मात्र या उत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आजही सुखकर झालेला नाही. साधारण गणेश चतुर्थीच्या 3 दिवस आधीपासून कोकणातील मूळगावी जाण्याचे कोकणवासियांचे नियोजन असते. यंदा गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वे 202 विशेष गाड्या, तर पश्चिम रेल्वेकडून 56 गाड्या सोडण्यात येणार आहेत. गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग पुन्हा सुऊ झाले होते. मात्र अवघ्या 5 मिनिटात 258 गणपती स्पेशल ट्रेनचे बुकिंग फुल्ल झाले आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवाची तिकिटे काढताना कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच एक हजारापार गेली होती. त्यानंतर तिकिट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती. तपासाअंती यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते. तिकीट आरक्षणात काळाबाजार केला जात असल्याचे स्पष्ट होऊनही या बाबत कोणतीही चौकशी वा दोषींवर कारवाई करण्यात आलेली नसल्याने यावर्षीही तेच घडले. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास हा चेंगराचेंगरीचाच होणार, हे स्पष्ट आहे.

एसटी महामंडळ सज्ज

मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे यंदा एसटीतर्फे सुमारे 4300 जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी 2,031 बसेस फुल्ल झाल्या आहेत. मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात सोडण्यात येणाऱ्या एसटीच्या 1301 बसेस गट आरक्षणासह एकूण 2,031 जादा बसेस फुल्ल झाल्या आहेत. व्यक्तिगत आरक्षणासह गट आरक्षणात अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकीट दरात सवलत दिली जात असल्याने यावर्षी एसटीवर अधिक भार पडणार आहे.

रखडलेल्या महामार्गची दरवर्षीची बोंब

कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. पेणपासून सिंधुदुर्गापर्यंत चौपदरीकरणाचे काही टप्पे पूर्णत्वास गेले असले तरी रखडलेल्या टप्प्यांमध्ये पावसाळ्यात पडणारे ख•s दरवर्षी गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांना तापदायक ठरत आले आहेत. दरवर्षीची ही बोंब आहे. गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गची एक मार्गिका सुरू करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक नव्हे, दोन नव्हे तब्बल नऊ दौरे महामार्ग पाहण्यासाठी गतवर्षी काढले. मात्र त्यातून फारसे काही घडले नाही. त्यामुळे दरवर्षीची बोंब यावर्षीही कायम आहे.

महामार्गाचा प्रवास सुखकर कधी होणार?

महामार्ग चौपदरीकरणात सिंधुदुर्गातील काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्पे बहुतांशी पूर्ण झाले असले तरी 3 टप्प्यात पन्नास टक्केही काम झालेले नाही. चिपळूण शहरातील उ•ाणपूल अपूर्ण आहे. वहाळ उ•ाणपूल रस्त्याला तडे गेल्याने बंद आहे. जगबुडी पुलाची एक मार्गिका बंद आहे परशुराम घाट, कशेडी बोगद्याची डोकेदुखी कायम आहे. सर्वाधिक काम रखडले आहे, ते रायगड जिल्ह्यात. त्यामुळेच तेथे महामार्गप्रश्नी शासनाला जागे करण्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. मात्र या आंदोलनांचा तितकासा परिणाम यंत्रणेवर झालेला दिसत नाही. महामार्ग पूर्णत्वाची डेडलाईन दरवर्षी दिली जाते. मात्र ती पाळलीच जात नाही. त्यामुळे महामार्गावरील सुखकर प्रवास नेमका कधी होणार, असा प्रश्न कोकणी जनता विचारत आहे.

आंदोलने, चिखलफेक सुरू

गणेशोत्सव जवळ आला की, महामार्ग अधिक चर्चेत येतो. मग वर्षभर शांतपणे बसलेली नेतेमंडळी रखडलेल्या महामार्गावर भरभरून बोलू लागतात. आताही तेच घडले आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर रखडलेल्या महामार्गवरून सडकून टीका केल्यानंतर तेवढाच पलटवार मंत्री चव्हाण व भाजपने कदम यांच्यावर केला आहे. यातून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे. मात्र यातून साध्य काय होणार, हे दोन्ही पक्ष आणि त्यांच्या नेते, पदाधिकाऱ्यांनाच माहित. कोकणी जनतेचे हाल मात्र कायम आहेत.

दिग्गज नेते, तरीही कोंडी फोडता आली नाही हे दुर्दैव

एकूणच कोकणातील गणेशोत्सव असो अथवा शिमगोत्सवासारखे कोणतेही सण असोत, चाकरमान्यांचा प्रवास तितकासा सुखकर नाहीच आणि विशेष म्हणजे कोकणातील नेतेमंडळीनांही कुणाचे काही पडलेले नाही. कोकणी माणूस आता या रखडलेल्या महामार्ग आणि येथील राजकीय नेतृत्वावर प्रचंड नाराज आहे. एकापेक्षा एक नेतेमंडळींची फळी कोकणात असतानाही कोकणचा एकमेव महामार्ग एवढी वर्षे रखडला, याचेच त्याना आश्चर्य वाटते.

विकासाबाबत लांबलचक भाषणे ठोकणारी नेतेमंडळी महामार्गाबाबतच थंड का पडतात, याचे कोडे त्यांना सुटलेले नाही. एकापेक्षा एक असे दिग्गज राजकारणी कोकणात आहेत. ते आक्रमक बोलतात. ही सर्व राजकीय नेतेमंडळी गेली 30-35 वर्षे कोकणच्या राजकारणात सक्रिय आहेत. मात्र या सर्वांना रखडलेल्या महामार्गाची कोंडी गेल्या 13 वर्षात फोडता आलेली नाही, हेच कोकणचे दुर्दैव आहे.

मुख्यमंत्री लक्ष देतील का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री बुधवारी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी या रखडलेल्या महामार्गाची दखल घेऊन कोकणवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी कोकणी जनतेतून होत आहे. मुंबई-गोवाचा प्रवास अधिक गतीमान करण्यासाठी नवा ग्रीन फिल्ड एक्प्रेस कधी होईल तेव्हा होईल, पण गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वास न्यावा, अशी अपेक्षा कोकणी जनतेची आहे.

राजेंद्र शिंदे

Advertisement
Tags :

.