रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
भुयारी मार्गाचा तिढा सुटणार केंव्हा : खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी प्रयत्न करण्याची मागणी
खानापूर : खानापूर-असोगा रस्त्यावरील रेल्वे स्थानकाच्या बाजूनी जाणारा असोगा रस्ता अत्यंत चिवळ बनवण्यात आला असून हा रस्ता फाटकाच्या दोन्ही बाजूनी खड्डेमय बनल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करताना धोका निर्माण झाला आहे. या फाटकाजवळ भुयारी मार्गाच्या निर्मितीसंदर्भात गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात भुयारी मार्गाला मुहूर्त काही लागलेला नाही. गेल्या सहा महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्गाच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. यावेळी आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या दोन महिन्यात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार, असे जाहीर केले होते. मात्र सहा महिने उलटून गेले तरी भुयारी मार्गाचा पत्ताच नाही.
गेल्या काही वर्षापासून या भुयारी मार्गाची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी फक्त आश्वासने देऊन वेळ मारुन नेण्यात येते. रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या आणि विद्युतीकरणाच्या कामाची पूर्तता करून संरक्षक भिंत उभारली गेली आहे. त्यामुळे असोगा, मन्सापूर, भोजगाळी, कुटिन्होनगर, वाजपेयी नगर या गावांना जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने दुपदरीकरणानंतर हा रस्ता अत्यंत चिवळ केला आहे. त्यामुळे रस्त्यावरुन एकाचवेळी दोन वाहने जाणे अवघड झाले आहे. तसेच दोन्ही बाजूच्या रस्त्यावर ख•s पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे.
गेल्या वर्षापासून आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि पदाधिकारी या भुयारी मार्गाबाबत वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे सांगत आहेत. मात्र गेल्या वर्षभरात अधिकाऱ्यांबरोबर बैठक आणि प्रत्यक्ष पाहणी याच्याशिवाय काहीही हालचाल झाली नाही. त्यामुळे नागरिकांत या भुयारी मार्गाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या भुयारी मार्गाबाबत भाजपकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे. भुयारी मार्ग निश्चितपणे होण्याचे आश्वासनही भाजप पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी देण्यात आलेले आहेत. मात्र याबाबत ठोस कृती होताना दिसून येत नाही. आता विश्वेश्वर हेगडे यांच्याकडून तरी या भुयारी मार्गाबाबत प्रयत्न होतील काय, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.