योग्याला कसलीही अपेक्षा नसते
अध्याय पहिला
गीतेत भगवंत अर्जुनाला तू ज्ञानी, तपस्वी, कर्मीष्ट होण्यापेक्षा योगी हो असा सल्ला सहाव्या अध्यायात देतात कारण पहिल्या तिघांना कसली ना कसली अपेक्षा असते पण योगी संपूर्ण निरपेक्ष असतो. भागवतातही ह्या गोष्टीचा पुनरुच्चार करून भगवंत उद्धवाला म्हणतात, एक निरपेक्षता हाती आली की मोक्ष मिळवण्याच्या दृष्टीने पुढील गोष्टी आपोआपच सोप्या होतात. भगवतगीतेत ते सांगतात, निरपेक्ष होत होत योगी त्याच्या कार्याने स्वत:तील दोष नाहीसे करून शेवटी मोक्षपदी आरूढ
होतो.
योगी तत्पर राहूनि दोष जाळित जाळित ।
अनेक जन्मी संपूर्ण होउनी मोक्ष पावतो।।6.45।।
ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा ।
मानिला तो असे योगी योगी होई म्हणूनि तू ।।6.46।।
समाधी साधनेतून आत्मिक बळ मिळवलेले योगी त्रैलोक्याला वश करणारे असतात. ते सकल जनांना पावन करतात. त्यांचे हृदय करुणेने पूर्ण असल्यामुळे ते पुष्कळांना योगाचे ज्ञान देतात. अशा प्रकारे वर्तणुक असलेल्या संत महंताचं, सिद्ध योग्यांची चरित्रे आपल्या वाचनात असतात. एखाद्या तळ्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते. त्यात कुणी एखादा खडा जरी टाकला तरी उठणाऱ्या कंपनांमुळे ते प्रतिबिंबही कंपित होते परंतु त्यामुळे सूर्याला काहीच फरक पडत नाही.
त्याप्रमाणे योगीही जगाच्या व्यवहारापासून अलिप्त असल्याने त्याच्याशी कुणी कसाही वागो त्यांच्या त्याच्याशी वागण्यात काहीच फरक पडत नाही. ते सर्वांशी सौजन्याने वागतात. अलिप्त राहून त्यांनी केलेले लोककल्याण, दाखवलेल्या लीला, लोकांच्या वागण्याकडे केलेले दुर्लक्ष इत्यादि गोष्टींचा उलगडा बाप्पांच्या सांगण्यावरून आपल्याला सहजी होतो. ते जीवन्मुक्त असतात व परमानंदसागरामध्ये मग्न असतात. डोळे मिटून देखील परब्रह्म आपल्या हृदयामध्ये पाहतात. हे असं अंत:चक्षुनी बाप्पाना पाहणं योग्यांना कसं शक्य होतं ते बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत,
ध्यायन्त: परमं ब्रह्म चित्ते योगवशीकृतम् ।
भूतानि स्वात्मना तुल्यं सर्वाणि गणयन्ति ते ।। 16।।
अर्थ- योगसाधनेने वश केलेल्या त्या परब्रह्माचे आपल्या चित्तामध्ये ध्यान करतात. सर्व जीवांना ते स्वत:च्या समान समजतात.
विवरण- बाप्पा म्हणतात, हे सत्पुरुष केवळ भक्तियोगाने व समर्पणभावाने माझ्याशी जोडले गेलेले असल्याने मी त्यांच्या स्वाधीन असतो. कारण मी भावभक्तीचा भुकेला आहे. अशा योगीजनांना अंत:चक्षुनी मला पाहता येते. ही झाली जेव्हा ते डोळे मिटून समाधीमध्ये असताना परमानन्दात डोलत राहून मला पहात असतात तेव्हाची गोष्ट. पण जेंव्हा डोळे उघडे ठेवून ते जगाकडे पाहतात तेव्हा त्यांना सर्वांच्यात माझीच रूपे दिसत असतात. थोडक्यात ते अंतर्बाह्य माझेच दर्शन घेत असतात. त्यामुळे त्यांना हा आपला तो परका असा भेद वाटत नाही.
हे वर्णन वाचलं की, दत्ताच्या आरतीत ‘सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त’ या ओळीतील भावार्थ लगेच लक्षात येतो. अंतर्बाह्य बाप्पाचं दर्शन घेणारे योगीजनांचं भूतमात्रावर अनुग्रह करणे हेच ध्येय असतं असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
येन केनचिदाच्छिन्ना येन केनचिदाहता: ।
येन केनचिदाकृष्टा येन केनचिदाश्रिता: ।। 17 ।।
करुणापूर्णहृदया भ्रमन्ति धरणीतले ।
अनुग्रहाय लोकानां जितक्रोधा जितेन्द्रिया: ।। 18।।
अर्थ- कशाने तरी आच्छादन केलेले, कशा तरी अन्नावर निर्वाह केलेले, कोणत्या तरी निमित्ताने आकर्षित झालेले आणि कशाचा तरी आश्रय करून राहणारे, करुणेने ज्यांचे हृदय भरलेले आहे असे ते योगी भूतमात्रावर अनुग्रह करण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर भ्रमण करतात. त्यांनी क्रोध जिंकलेला असतो, इंद्रिये जिंकलेली असतात.
क्रमश: