पाऊस ओसरला पण, शेतवडीतील पाणी जैसे थेच
उगवलेले भातपीक खराब होण्याची शक्यता
वार्ताहर /नंदगड
नंदगड, बिडी, हलशी परिसरात गेल्या पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले आहे. उगवून येणाऱ्या भात पिकात पाणी साचल्याने भात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पाऊस थांबणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी थोडाफार पाऊस थांबला असला तरी गेल्या चार-पाच दिवसापासून झालेल्या पावसामुळे शेतवडीतील पाणी मात्र जैसे थेच आहे. मंगळवार दि. 5 पासून नंदगड, बिडी, हलशी, बेकवाड, परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी साचले आहे. रोजच पडणाऱ्या पावसामुळे त्यात पुन्हा भर पडत आहे. त्यामुळे शेतवडीतील पाणी काढणे कठीण झाले आहे.आणखी काही दिवस असाच पाऊस पडल्यास पेरलेले भातपीक कुजून नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पावसाने विश्रांती घेणे गरजेचे आहे.