प्लास्टिक कचरा विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर
कंग्राळी बुद्रुक परिसरात मुख्य रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने संताप : लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
ग्रामीण भागातील अनेक गावातील रस्त्याकडेला आज प्लास्टिक कचऱ्याचे ढीग पहावयास मिळत आहेत. शासन व लोकप्रतिनिधी वर्षातून एकदा स्वच्छ भारत आंदोलन दिवस मोठ्या गांभीर्याने पाळून परिसरात स्वच्छता राखा, दुर्गंधी पसरवू नका कचरा रस्त्याकडेला टाकू नका असे संदेश मनोगतातून व्यक्त करतात. परंतु नंतर हेच अधिकारी व लोकप्रतिनिधी कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूने जातात. परंतु याठिकाणी कचरा कुणी टाकला याबद्दल साधी चौकशी सुद्धा करत नाहीत. यामुळे प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीचा मोठा गंभीर प्रश्न तयार झाला आहे.
येथे कचरा टाकू नये फलकाजवळही कचऱ्याचे ढीग
आज नागरिकांनी कुठे कचरा टाकावा, कुठे टाकू नये याची सीमाच ओलांडली आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रा. पं. च्यावतीने स्वच्छता राखण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी येथे कचरा टाकू नये, टाकताना आढळल्यास दंडासहीत कठोर कारवाई करण्यात येईल परंतु कचरा टाकणाऱ्यांना त्या फलकावर लिहिलेल्या सामाजिक मजकुराचे कोणतेच सोयरसुतक नसते. घरातून कचरा भरून आणलेले पोते या ढिगाऱ्यामध्ये टाकून देतात. अन् स्वच्छ भारत आंदोलन की ऐसी की तैसी असा उलट संदेश देऊन दुर्गंधी पसरवायचे कार्य करून जातात.नागरिकांनीच जर आपल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावली तर
आज प्रत्येकाने जर स्वत:चे घर, गल्ली, गाव, शहर, राज्य व देश याठिकाणी स्वच्छ भारत आंदोलन मोहीम यशस्वी करायची असेल तर प्रत्येकाने स्वत:च्या कचऱ्याची स्वत:च जर विल्हेवाट लावली तर रस्त्याकडेला असे प्लास्टिक कचऱ्याचे ढा दिसणारच नाहीत. परंतु आपले घर, गल्ली, गाव, शहर, राज्य देश जर प्रत्येकाने स्वच्छ भारत आंदोलन या घोषवाक्याला अनुसरून स्वत:च्या कचऱ्याची अशाप्रकारे विल्हेवाट लावून कचरामुक्त घर, गल्ली, गाव, शहर, राज्य व देश आदी परिसरातील रहिवाशानी असे महान कार्य केल्यास प्लास्टिक कचरा रस्त्याकडेला टाकण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
शासनानेच प्लास्टिक कचरा समस्या संपुष्टात आणण्याची योजना आखावी शासनाला सुद्धा आज प्लास्टिक कचरा समस्या संपुष्टात आणणे मोठे आव्हान ठरले आहे. यासाठी शासनाने कचऱ्यापासून वस्तू बनवायचे प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. अशा प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमी नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहेत. शासनाने आज अनेक योजना आखल्या. त्यातील अनेक योजनांचा नागरिकांना कोणताही लाभ होत नाही परंतु आर्थिक फंड मात्र, वाया गेलेला असतो. यासाठी तज्ञ शास्त्रज्ञांचे प्लास्टिक कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट प्रकल्पाच्या माध्यमातून कशी लावता येईल यावर अभ्यास करून स्वच्छ भारत आंदोलनचा नारा यशस्वी करण्याचीही मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.