पंतप्रधान पाकिस्तानाला गुडघ्यांवर वाकवतीलच!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास : ताळगाव येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा
पणजी : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कल्पनेच्याही पलीकडचा धडा शिकविण्याचा जो निर्धार केलेला आहे तो सत्यात आणतील आणि बदला घेण्यात कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नाहीत. पाकिस्तानला गुडघ्यावर आणल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
काल रविवारी पणजीत ताळगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रथम त्यांनी पंतप्रधानांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहिला आणि नंतर मार्गदर्शन करताना त्यांतील प्रमुख मुद्यांचा उल्लेख केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार जेनिफर मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, दक्षिण गोवा सहप्रभारी सर्वानंद भगत, सोशल मीडिया संयोजक रूपेश कामत, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर यांच्यासह अन्य भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, पहलगाम हल्ल्यानंतर मोदी यांनी दहशतवाद्यांसह या हल्ल्याचे सूत्रधार आणि त्यांच्याप्रती सहानुभूती दाखविणाऱ्यांना कठोर अद्दल घडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी कृतीही आरंभली असून पाकिस्तानला गुडघ्यावर आणल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांच्या याच निर्धाराचा भाग म्हणून राज्य सरकारने स्थलांतरितांची झाडाझडती आरंभली. नाकाबंदी सुरू केली. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. स्थलांतरित कामगार, भाडेकरू तसेच संशयास्पद वावर असलेल्या अशा 3000 पेक्षा जास्त लोकांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ते तिन्ही नागरिक पाकिस्तानकडे रवाना
राज्यात सध्या तीन पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन तर अन्य 17 जण दीर्घकालीन व्हिसावर वास्तव्यास होते. त्यातील अल्पकालीन व्हिसावरील तिघेही पाकिस्तानकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दोन वर्षांत 10 ते 12 हजार नोकऱ्या
आगामी दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम आणि अन्य खात्यांमध्ये मिळून 10 ते 12 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असून यातील किमान 4 हजार नोकऱ्या गोवा मानव संसाधन विकास महामंडळाकडून भरण्यात येणार असल्याचे सांगितले. सरकारने केवळ उच्चशिक्षितांसाठीच नव्हे तर दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांसाठीही विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत आतापर्यंत 14 हजार जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दामू नाईक यांचा गौरव
या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या अध्यक्षपदाचे 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘आमचो दामू 100’ या व्हिडिओचे सादरीकरण करण्यात आले. अशाप्रकारे शंभर दिवसांची यशस्वी वाटचाली पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
गोव्याचा चौफेर विकास : जेनिफर
मेळाव्यात बोलताना ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी, प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत गोव्याचा चौफेर विकास झाल्याचे गौरवोद्गार काढले. त्यामुळे पुढील कार्यकाळातही सावंत हेच मुख्यमंत्री असावेत अशी सदिच्छा व्यक्त करताना त्यांनी ताळगांवमध्ये झालेल्या विकासकामांचाही आढावा घेतला.