बिजगर्णी-कावळेवाडी रस्त्याच्या पॅचवर्कचे केवळ सोंग
रस्त्याचे पॅचवर्कचे कामकाज निकृष्ट दर्जाचे : नागरिकांतून तक्रार
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदीपासून ते कर्लेपर्यंतच्या संपर्क रस्त्यावरील खड्ड्यांचे पॅचवर्क कामकाज करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या आजूबाजूच्या झाडेझुडपे यांची साफसफाई केली आहे. मात्र कावळेवाडी ते बिजगर्णी या रस्त्याचे पॅचवर्कचे कामकाज निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे केवळ सोंग करण्यात आले असल्याची चर्चा या भागात सुरू आहे. या रस्त्याचे कामकाज सुरू असताना कावळेवाडी गावातील अॅड. नामदेव मोरे यांनी याबाबत सदर कंत्राटदाराला जाब विचारला होता. त्यावेळी सदर कंत्राटदाराने रस्त्याचे कामकाज चांगल्या पद्धतीचे करणार, असेही सांगितले होते. मात्र तसे कामकाज झाले नसल्याची माहिती नागरिकांनी व नामदेव मोरे यांनी दिली आहे. पश्चिम भागातील विविध गावांसाठी जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यांवर वाहनधारकांची रोज मोठ्या संख्येने वर्दळ असते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. खड्ड्यांची तात्पुरुस्ती दुरुस्ती करण्यात आली. मात्र हे पॅचवर्कचे कामकाज योग्य पद्धतीचे झाले नाही. यामुळे सध्याही खड्डेमय रस्त्यातूनच वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे कामकाज अशा पद्धतीने होत असेल तर याला जाब विचारणार कोण, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.