For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अश्रफअलीचा खून टोळी युद्धातून?

11:01 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अश्रफअलीचा खून टोळी युद्धातून
Advertisement

खून प्रकरणातील सातजण जेरबंद : निपाणीतील खून प्रकरणाचा 48 तासांत छडा 

Advertisement

निपाणी : निपाणीतील भीमनगरात पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुंड अश्रफअली नगारजी याचा एका टोळक्याकडून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री 8.30 वाजता घडली होती. या प्रकरणातील आरोपींना 48 तासात जेरबंद करण्यात निपाणी पोलिसांना यश आले आहे. एकूण 11 पैकी 7 आरोपींना जेरबंद करण्यात आले असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीतून हा खून झाला असला तरी यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा विचार करता टोळीयुद्धातून हा भडका उडाल्याची चर्चा आहे.

रवी इराण्णा शिरगावे (वय 27, रा. हणबर गल्ली, निपाणी), रोहित प्रशांत पठाडे (वय 24, रा. हौसाबाई सावंत कॉलनी, साखरवाडी, निपाणी), ओम दिलीप कंदले (वय 23, रा. कुंभार गल्ली, निपाणी), पारस संजय श्रीखंडे (वय 22, रा. बसव सर्कलनजिक, जत्राट वेस, निपाणी), ऋतिक सदाशिव पावले (वय 25, रा. महादेव गल्ली, निपाणी), अरबाज राजमहम्मद सय्यद (वय 24, रा. हौसाबाई सावंत

Advertisement

कॉलनी, साखरवाडी, निपाणी), अनिकेत कृष्णा घोडगेरी (वय 24, रा. सासणे गल्ली, निपाणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये रवी हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, रोहित हा वाहनचालक, ओम हा इलेक्ट्रिशन, पारस हा सेंट्रिंग कामगार, ऋतिक हा खाजगी फायनान्स कंपनीत वसुली कर्मचारी, अरबाज हा ट्रकचालक आणि अनिकेत हा फेब्रिकेशनचे काम करतो.

याबाबत अधिक माहिती अशी की, अश्रफअली नगारजी आणि सैफअली नगारजी हे दोघे भाऊ बुधवारी रात्री भीमनगर म्युनिसिपल हायस्कूलनजिक मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतत होते. याचवेळी उर्दू शाळेनजिक आले असता दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने त्यांना घेरून अश्रफअली याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर हल्लेखोरांनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास मोहीम गतिमान केली. गुरूवारी आरोपींच्या शोधासाठी शहर उपनिरीक्षक उमादेवी गौडा, ग्रामीण उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, बसवेश्वर चौकचे उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती.

सदर पथकांनी अवघ्या 48 तासात कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून 11 पैकी 7 आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. यानंतर त्यांना निपाणी न्यायालयात हजर केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ.भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती, आर. बी. बसर्गी, डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय बी. एस. तळवार व सहक्रायांनी केली. सदर आरोपींवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 115(2), 103, 189(2), 191(2), 191 (3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अन्य चौघांचा शोध सुरू

सदर खून प्रकरणात एकूण 11 जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी सात जणांना शनिवारी अटक करण्यात आली असून उर्वरित चार जणांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील,  असे सीपीआय  तळवार यांनी सांगितले.

खुनाचा कट रचणाऱ्याचाच खून ?

दरम्यान, पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी अश्रफअली व सहकारी आणि रवी शिरगावे व त्याचे सहकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. यावेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा झाली होती. अशातच रवी याचा मित्र अभिषेक दत्तवाडे याचा दोन वर्षांपूर्वी मानवी गल्ली येथे खून झाला होता. या खुनात अश्रफअली याचा सहभाग होता. अभिषेक याच्या अंत्यसंस्कारावेळी या खुनाचा बदला घेण्याचे काही मित्रांनी ठरवले होते. यातच अश्रफअली याने रवी याच्याही खुनाचा कट रचल्याची माहिती रवीला समजली होती. त्यामुळे आपल्या खुनाचा कट रचणाऱ्याचाच खून करायचा या उद्देशाने हा खून झाल्याचे तपासात दिसून आले आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत. हा खून टोळी युद्धातून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून हे नवे आव्हान निपाणी पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.