For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाविकास आघाडीसमोर महायुतीचे कडवे आव्हान

01:05 PM May 08, 2025 IST | Radhika Patil
महाविकास आघाडीसमोर महायुतीचे कडवे आव्हान
Advertisement

कोल्हापूर / कृष्णात चौगले : 

Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इच्छूकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही विरोधकांना धोबीपछाड करण्याचा चंग महायुतीच्या नेत्यांनी बांधला आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्णी लावून ‘गल्ली ते दिल्ली’ केवळ ‘महायुती’ असे राजकीय समीकरण निश्चित करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून ताकदीने प्रयत्न केले जाऊ शकतात. तर काहीसा आत्मविश्वास गमावलेल्या महाविकास आघाडीकडून पुन्हा नव्या ताकदीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या गत निवडणुकीत तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या ताकदीवर जिल्हा परिषद निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे ओळखून जनसुराज्य, ताराराणी आघाडी व रिपाई गटाला सोबत घेत आघाडी केली. या ‘भाजता’ आघाडीला 25 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही 25 जागा मिळाल्या. दोन्ही काँग्रेससह भाजप आघाडीलाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. परिणामी सत्ता स्थापनेसाठी पुन्हा चढाओढ झाली. त्यावेळी तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तेची ताकद व माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना सोबत घेऊन काँग्रेसला शह दिला.

Advertisement

 त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत ‘वेट अँड वॉच‘ ची भूमिका घेतलेल्या तत्कालिन शिवसेनेचा नेमका पाठींबा कोणाला मिळणार यावर दोन्ही पक्षांचे सत्तेचे गणित अवलंबून होते. यामध्ये काँग्रेस आघाडी सत्तेपर्यंत पोहोचत नसल्याचे लक्षात आल्यानंतर माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर यांनी अखेरच्या क्षणी काँग्रेसचा हात सोडून भाजपला पाठींबा दिला. त्यामुळेच भाजपचे पारडे जड झाले. तसेच तत्कालिन परिस्थितीत कागलच्या राजकारणामध्ये मंडलिक-मुश्रीफांची गट्टी जमल्यामुळे आणि गोकुळच्या राजकारणातून अमरिष घाटगे यांनी भाजपला अर्थातच महाडिकांना साथ दिली. तसेच सत्ता स्थापनेनंतर काँग्रेसच्या रेश्मा राहूल देसाई यांनी भाजप आघाडीला बाहेरून पाठींबा दिल्यामुळे भाजपचे संख्याबळ 38 वर पोहोचले. तर काँग्रेस आघाडीचे संख्याबळ 28 वरून 27 वरती खाली आले. त्यावेळी शौमिका महाडिक या अध्यक्ष आणि शिवसेनेचे सर्जेराव पाटील उपाध्यक्ष झाले होते.

अडीच वर्षानतंर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदेतही सत्तांतर झाले. त्यानुसार 2 जानेवारी 2019 रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड झाली. यामध्ये आमदार सतेज पाटील गटाचे काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बजरंग पाटील यांना अध्यक्ष तर तत्कालिन राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. यावेळी अन्य घटक पक्षातील सदस्यांना सभापती पद देण्यात आले. पुन्हा एक वर्षानंतर बजरंग पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील हे अध्यक्ष झाले.

  • महायुतीच्या उमेदवारीसाठी चढाओढ

राज्यात महायुतीची निर्विवाद सत्ता आल्यामुळे आगामी जि.. आणि पं..च्या निवडणुकीमध्ये महायुतीची उमेदवारी घेण्यासाठी इच्छूकांकडून पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. परिणामी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील दुसऱ्या फळीतील कार्यकत्यांकडून महायुतीचा झेंडा हाती घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांना पक्षांतर करण्यापासून रोखण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आव्हान आहे.

  • काही गटात होणार स्थानिक आघाड्यांचा खेळ

तत्कालिन महाविकास आघाडीला सुरुंग लावून राज्यात शिंदे-फडवीस सरकार अस्तित्वात येत असताना शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. त्यामुळे राज्यासह जिह्यातील राजकारण ढवळून निघाले. मूळ शिवसेना आणि शिंदे गट अशी फाळणी झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे विभाजन झाले. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीसह आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाबरोबरच शिंदे गट दिसणार आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटासह अजित पवार गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात दिसतील. साहजिकच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गट-भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट-जनसुराज्य अशी प्रथमदर्शनी युती दिसणार आहे. पण प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांचा खेळ दिसण्याची शक्यता आहे. अनेक जि..गटात महायुतीमधील घटक पक्षांचे उमेदवार परस्परविरोधात दिसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची राजकीय सोय करण्यासाठी आणि त्या माध्यमातून आपली ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक नेत्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना ज्या ठिकाणी पक्षीय बंधन अडसर ठरेल, त्या ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे ‘सुरक्षा कवच’ बाहेर काढले जाणार आहे.

  • जिल्हा परिषदेच्या गत सभागृहातील पक्षीय बलाबल

भाजपा 14, जनसुराज्य 06, ताराराणी 3, चंदगड युवक आघाडी 2, चंद्रदीप नरके गट 3, संजयबाबा घाटगे गट 1, सुजित मिणचेकर गट 1, सत्यजीत पाटील गट 2, आवाडे गट 2, स्वाभीमानी 2, अपक्ष 1, काँग्रेस 14, राष्ट्रवादी 11, उल्हास पाटील गट 1, प्रकाश आबिटकर गट 2

Advertisement
Tags :

.