भारतीय टी-20 संघाची घोषणा एप्रिल अखेरीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने जून महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड एप्रिल महिन्याच्या अखेरीस केली जाईल, असे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या संघांना आपल्या खेळाडूंची यादी 1 मेपर्यंत सादर करण्याची अट आयसीसीने घातली आहे. दरम्यान 25 मेपर्यंत संघाला आपल्या संभाव्य खेळाडूंमध्ये फेरबदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ जाहीर होईल. एप्रिलच्या अखेरीपर्यंत आयपीएलाचा निम्मा टप्पा संपतो. दरम्यान या स्पर्धेसाठी इच्छुक क्रिकेटपटूंच्या फॉर्म तसेच तंदुरूस्तीबाबत राष्ट्रीय निवड समिती सदस्यांना विचार करावा लागेल. 19 मे रोजी आयपीएल स्पर्धेचा लीग टप्पा संपल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंची पहिली तुकडी न्यूयॉर्कला रवाना होईल.
दरम्यान टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्याकरीता सध्या निवड समितीमधील चार सदस्य आयपीएलच्या विविध सामन्यावेळी हजर राहून नवोदित क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत.