दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या
13 राज्यांमधील 89 जागांवर उद्या मतदान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी देशभरातील 89 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व जागांसाठीचा निवडणूक प्रचार बुधवारी सायंकाळी 6 वाजता संपला. शुक्रवारी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर अशा 13 राज्यांमधील 89 मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडले. आता निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांमध्ये राहुल गांधी, अऊण गोविल, हेमा मालिनी, शशी थरूर, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या जागांमध्ये केरळमधील वायनाड, बिहारमधील किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूर, बांका, राजनांदगाव, महासमुंद आणि छत्तीसगडमधील कांकेर आणि कर्नाटकातील म्हैसूर आणि बेंगळूर यांचा समावेश आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून उमेदवार आहेत. हेमा मालिनी या उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भाजपच्या उमेदवार आहेत. रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अऊण गोविल हे मेरठमधून भाजपचे उमेदवार आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर तिऊअनंतपुरममधून निवडणूक लढवत आहेत. येथे त्यांची स्पर्धा काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी आहे. जम्मू लोकसभा जागेवर भाजपचे जुगल किशोर आणि काँग्रेसचे रमण भल्ला आहेत.
दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या 89 जागांवर एकूण 1,206 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या टप्प्यात केरळमधील लोकसभेच्या सर्व 20 जागांवर मतदान होणार आहे. याशिवाय कर्नाटकातील 14 आणि राजस्थानच्या 13 लोकसभा जागांवर 26 एप्रिललाच मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 8 जागांवर मतदान होणार आहे. गौतम बुद्ध नगर आणि मथुरा या जागांवर सर्वाधिक उमेदवार आहेत. या टप्प्यात राज्यातील गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, अमरोहा, मेरठ, बागपत, बुलंदशहर, अलीगढ आणि मथुरा या जागांसाठी मतदान होणार आहे. मणिपूरच्या एका जागेसाठीही 26 एप्रिल रोजी मतदान होत असून त्यामध्ये बाह्य मणिपूरचा समावेश आहे.