For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारणाशिवाय होणाऱ्या आनंदाची खुमारी काही औरच असते

06:48 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारणाशिवाय होणाऱ्या आनंदाची खुमारी काही औरच असते
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, कायम आनंद मिळवण्यासाठी योगमार्ग धरावा. योगभूमीचा प्रकाश मनामध्ये प्रकाशित होऊन टिकण्यासाठी योग्याने योगसाधना कशी करावी त्याचे टप्पे आहेत. सर्वप्रथम आपल्या आवडत्या दैवताचे स्मरण करून त्याची आपल्याला आवडणारी मूर्ती डोळ्यापुढे आणून त्याची मानसपूजा करावी. मानसपूजा करत असताना आपण दैवताची मूर्ती नजरेपुढं आणत असतो. नामस्मरणाने त्या दैवताला हाक मारत असतो. अशी हाक मारताना त्या दैवताचे अवतारकार्यातील भव्य स्वरूप नजरेपुढं उभं राहतं व आपोआपच नामस्मरण अधिकच आवडीने  केले जातं. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाशी सतत संपर्क ठेऊन असते, त्यासाठी ती तो दिसेनासा झाला की त्याला हाक मारू लागते, परगावी असेल तर त्याची आठवण आल्यावर त्याच्याशी फोनवर बोलते त्याप्रमाणे नवविधा भक्तीतील कोणताही प्रकार वापरून आपण आवडत्या दैवताच्या अनुसंधानात असावे. म्हणजे त्याच्याशी सतत संपर्क राहतो. अशाप्रकारे ईश्वराच्या संपर्कात सतत असणे ह्यालाच सवितर्क समाधी असे म्हणतात.

आपल्या आवडत्या दैवताशी सतत संपर्क किंवा अनुसंधान राखण्याचा विचार सतत मनात राहिल्याने इतर विचार आपोआपच बाजूला पडतात. त्यामुळे त्यावर चित्त करत असलेले चिंतन थांबते. स्वस्थ होत जाऊन शांत होऊ लागते. असा अभ्यास अनेक वर्षे आदरपूर्वक केल्यावर तो पक्व होतो. मग केवळ आराध्याच्या मूर्तीचा विचार मनात येतो व त्या विचारावर मन स्थिर होते. ही सविचार समाधी होय. व्यवसायाकडे जाणारा वेळ सोडून जाता, येता, उठता, बसता, काम करताना उपास्याचे चिंतन घडत असते. असे जरी असले तरी साधकाने रोजच्या ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी नियमितपणे हा अभ्यास चालूच ठेवावा.

Advertisement

ह्या स्थितीपर्यंत ज्ञानेंद्रियांमार्फत आनंद घेण्याचे साधकाचे काम चालूच असते कारण अजून त्याची भोगविषयांची आवड टिकून असते. तो विषयांपासून आनंद मिळवत असल्याने त्याच्या चित्तात रजोगुणी प्रवृत्तीचा मळ म्हणजे त्या इच्छांचे विचार साठून असतात पण सविचार समाधी परिपक्व होऊ लागली की, चित्त सत्वसंपन्न झाल्याने आनंद वाटू लागतो. त्यातील रजोगुणामुळे म्हणजे भोग प्रवृत्तीमुळे जो मळ साठलेला असतो तो नाहीसा होऊन त्याला इंद्रियांच्याशिवाय बुद्धिग्राह्य सुख व त्यापासून मिळणारा आनंद मिळू लागतो. त्यामुळे इतर सुखे व त्यापासून मिळणारा आनंद फिका वाटू लागतो, एव्हढेच नव्हे तर साधकावर एखादे महादु:ख येऊन कोसळले तरी त्याचे चित्त विचलित होत नाही. सविचार समाधीची ही पक्वावस्था होय. असा सात्विक आनंदाचा अनुभव जोपर्यंत चित्तात सतत जाणवत नाही तोपर्यंत अभ्यास अजून दृढ झालेला नाही असे समजावे. सविचार समाधीची परिपक्व अवस्था म्हणजे या समाधीतून उठल्यावरसुद्धा आपल्याला त्यातून मिळालेल्या आनंदाचे सतत स्मरण होत राहणे. असं स्मरण होणं फार उच्च कोटीचा आनंद देऊन जातं. या आनंदाची ज्याला सवय होईल त्याला इतर वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती निर्मित आनंद अगदीच किरकोळ वाटेल. हा आनंद कोणत्याही कारणाशिवाय होत असल्याने त्याची खुमारी काही औरच असते. आत्तापर्यंत विषयसुखात रममाण झाल्याने किती मोठ्या आनंदाला आपण मुकलो होतो याची खात्री होऊन, साधकाला विषयसुखाची इच्छाच काय, त्याचे विचारही मनात येत नाहीत. माणसाला जेव्हा काहीतरी मोठी गोष्ट प्राप्त होते तेव्हा त्याच्याकडून लहान गोष्टीचा आपोआपच त्याग होतो. व्यवहारात याचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. मोठी गाडी घेतली की, लहान गाडी नको वाटते. मोठं घर घेतलं की, लहान जागा अपुरी वाटते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. सबब सविचार समाधीतील आनंदाची अनुभूती घेतलेला साधक इतर कोणत्याही गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाकडे ढुंकूनही पहात नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.