For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेध ऐतिहासिक आकाशभरारीचा

06:33 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
वेध ऐतिहासिक आकाशभरारीचा
Advertisement

अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताच्या इस्रोने गेल्या काही वर्षांमध्ये यशाचे नवे मापदंड निर्माण करुन संपूर्ण जगाला आपल्या प्रतिभेचा, कर्तृत्वाचा आणि आपल्या शास्रज्ञांच्या अभ्यासूपणाचा परिचय घडवून दिला. चांद्रयान 3 मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश बनला. आता 40 वर्षांनंतर भारताचे अंतराळप्रवासी शुभांशु शुक्ला हे अॅक्सिओम स्पेसच्या एक्स-4 मिशनद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा दौरा करणार आहेत. या अंतराळस्थानकात जाणारे ते पहिले भारतीय नागरिक असतील. यातून एक नवा इतिहास लिहिला जाणार आहे.

Advertisement

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे मे 2025 मध्ये अॅसिओम स्पेसच्या एस-4 मिशनद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (आयएसएस) दौरा करणारे पहिले भारतीय नागरिक ठरणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल 40 वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय अंतराळवीर अंतराळात प्रवास करतोय. याआधी, 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत संघाच्या सोयूझ यानातून अंतराळ प्रवास केला होता. भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनीही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा दौरा केला आहे, मात्र त्या अमेरिकन नागरिक होत्या आणि नासासाठी काम करणाऱ्या अंतराळवीर होत्या. शुभांशु शुक्ला मात्र संपूर्णपणे भारतीय नागरिक आहेत आणि ते भारतीय हवाई दलातून निवडले गेले आहेत.

अंतराळातील योजना

Advertisement

शुक्ला यांनी सांगितले की, त्यांना शून्य गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) अनुभवण्याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यांनी अंतराळ स्थानकात योग करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे आणि भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवणाऱ्या वस्तू तिथे नेण्याचा विचार केला आहे. त्यांना भारतीय खाद्यपदार्थ चाखण्याची आणि आयएसएसवर नेण्याची इच्छा देखील आहे. शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कंप्युटर सिस्टम आणि डिजिटल डिस्प्लेंचे अभ्यास करणार आहेत. या प्रयोगात, डोळे-हात यांच्या समन्वयाने इशारे देण्याची क्षमता, तसेच डिजिटल क्रीनशी संबंधित अडचणी आणि प्रतिक्रिया यांचा अभ्यास केला जाईल. यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांमधील संगणकीय इंटरफेस अधिक वापरण्यास सुलभ (यूजर-फ्रेंडली) होऊ शकतील.

मिशनमधील इतर सदस्य

या मिशनमध्ये शुक्ला यांच्यासोबत नासाच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन, युरोपियन स्पेस एजन्सीचे स्लावोज उनांस्की-विस्नीवस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे इतर तीन सदस्य सहभागी असणार आहेत.

कोण आहेत शुभांशु ?

शुभांशु शुक्ला यांचा जन्म सन 1985 चा. जन्मस्थळ लखनऊ. 1999मध्ये कारगिलचे तुंबळ युद्ध झाले. या युद्धातील भारतीय लष्कराच्या अतुलनीय शौर्याच्या कथा शुभांशु यांची बहीण त्यांना सांगत असे. तेव्हाच शुभांशु यांच्या मनाने घेतले, की आपण पुढे लष्करातच जायचे. अंतराळात जाणाऱ्या प्रत्येक सदस्याला कठीण चाचण्या व प्रशिक्षण प्रक्रियेतून जावे लागते. शुभांशु शुक्ला हे 2006 पासून लढाऊ विमान उडवणाऱ्या हवाई दलाच्या ताफ्यात होते. ते फायटर कॉम्बॅट लीडर व टेस्ट पायलट आहेत आणि त्यांचा सुमारे 2,000 तासांचा उ•ाण अनुभव आहे. त्यांनी एसयू-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जगुआर, हॉक, डोर्नियर, एएन-32 यांसारखी अनेक विमाने उडवली आहेत.

2019 मध्ये भारताच्या गगनयान मानव अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. भारत आणि रशियामध्ये गगनयानसाठी सहकार्याचा करार झाल्यानंतर, त्यांनी 2021 मध्ये मॉस्कोमधील गागरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमधून प्रशिक्षण घेतले. नंतर, त्यांनी इस्रोच्या बेंगळूरू प्रशिक्षण केंद्रातील विविध परीक्षणांमध्ये सहभाग घेतला. 27 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गगनयान अंतराळवीर म्हणून शुभांशु शुक्ला यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांची अॅसिओम मिशन-4 साठी निवड झाली. त्यानंतर 31 जानेवारी 2025 रोजी ते या मिशनच्या अंतिम क्रूमध्ये सामील झाले. भारताने आजवर जागतिक अंतराळ संस्थांसोबत केलेल्या सहकार्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.

 चांद्रयान-1: ऐतिहासिक मोहीम

भारताची चांद्रयान-1 मोहिम (2008) हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्या मोहिमेदरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी नाही असे समजले जात होते, पण चांद्रयान-1 च्या उपकरणांनी पाण्याचे अणू असल्याचा क्रांतिकारी शोध लावला. चांद्रयान 3 मोहिमेद्वारे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. अलीकडेच भारताने अंतराळात डॉकिंग प्रणाली यशस्वी करुन दाखवली आहे. भारताचे आदित्य एल मिशनही यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. भारताची स्वत:ची मिनी स्पेस लॅब 2025 च्या सुरुवातीलाच, भारताने स्वत:ची एक लघु अंतराळ प्रयोगशाळा (मिनी स्पेस लॅब) सुरु केली. या प्रयोगशाळेत अंतराळात लोबियाच्या बिया उगवणे, पालकाच्या पेशी वाढवणे आणि बॅक्टेरिया वाढवणे असे प्रयोग यशस्वीरीत्या पार पडले.

इस्रोने ग्लोबल स्पेस एजन्सींसोबत भागीदारी का केली?

इस्रोने ज्या एजन्सींनी मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयोग केले आहेत, त्यांच्या सहकार्याचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे. अॅसिओम स्पेस ही त्यापैकीच एक आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने मानव उपस्थित राहिला आहे. 21व्या शतकात ही स्पेस लॅब मानवतेच्या अंतराळ चौकी किंवा ह्युमॅनिटी आऊटपोस्ट म्हणून ओळखली जाते. ही एक अद्भूत अशी प्रयोगशाळा आहे. भविष्यातील मंगळ आणि चंद्र मोहिमांसाठी अन्ननिर्मिती कशी करावी, यासाठी येथे वनस्पती संशोधन केले जाते. अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणामुळे जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि भौतिकशास्त्रातील प्रयोगही तेथे केले जातात. जवळपास 5 बेडरुमच्या फ्लॅट इतका आकार असणारे आणि पृथ्वीपासून 403 किलोमीटर अंतरावर असणारे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक ही स्थिर संरचना नाहीये. ते अंतराळात सतत फिरत राहणारे महाकाय अंतराळ यान असून ते 28000 किलोमीटर प्रति तास या वेगाने पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहे. या अंतराळस्थानकात दिवसातील 24 तासात 16 वेळा सूर्योदय होतो आणि 16 वेळा सूर्यास्त होतो. भारत कधीही या स्थानकाचा भाग नव्हता. त्यामुळे शुभांशु शुक्ला हे आयएसएसवर पोहोचणारे पहिले भारतीय ठरणार आहेत.

आयएसएसची पहिली खासगी अंतराळवीर मोहीम, एझियम मिशन, 1 एप्रिल 2022 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. ती 17 दिवस परिभ्रमण प्रयोगशाळेत राहिली. दुसरे एझियम मिशन 2 मे 2023 मध्ये लाँच करण्यात आले. या मोहिमेने आयएसएसवर आठ दिवस घालवले. एझियम मिशन 3 जानेवारी 2024 मध्ये लॉन्च झाली आणि तिने या स्टेशनवर 18 दिवस घालवले. एझियम मिशन 4 साठी 14 दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान एक वेगळा प्रयोग म्हणजे अंतराळात बीज अंकुरित करणे, यात मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये बियांचे अंकुरण आणि वाढ कशी होते, हे तपासले जाईल. यामागे भविष्यातील अंतराळवीरांसाठी एक विश्वासार्ह अन्न स्रोत उपलब्ध करून देता यावा, हा उद्देश आहे.

मायक्रोग्रॅव्हिटीमधील संगणकीय प्रयोग

अॅसिओम स्पेस 4 वर एक प्रयोग

मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये अंतराळवीर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि संगणकांशी कसा संवाद साधतात यावर केंद्रित असणार आहे. यामागे इस्रोचा उद्देश अंतराळातील संगणकीय क्रीन वापरामुळे शरीरावर आणि मेंदूवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणे आहे.

या संशोधनातून मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये इशारे करणे, नजर स्थिर ठेवणे आणि डोळ्यांची गती कशी प्रभावित होते, हे अभ्यासण्यात येणार आहे. हे बदल मानसिक तणावाच्या पातळीवर कसा परिणाम करतात, हेही यातून स्पष्ट होईल. परिणामी, भविष्यातील अंतराळयानांची संगणक प्रणाली अधिक मानवाभिमुख तयार करता येणे शक्य होणार आहे.

- विनायक सरदेसाई

Advertisement
Tags :

.