संदेशखाली घटनेची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल
पश्चिम बंगालमध्ये अनेक महिलांचे तृणमूल नेत्यांकडून लैंगिक शोषण
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात संदेशखालीमध्ये ‘बंदुकीचा धाक’ दाखवून अनेक महिलांचे झालेले लैंगिक शोषण तसेच आदिवासी भूमीची मालकी बदलण्याच्या आरोपांची कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली आहे. आदिवासींची भूमी बळकावणे आणि महिलांचे लैंगिक शेषण झाल्याचे वृत्त पाहून आम्ही अत्यंत दु:खी आणि त्रस्त आहोत असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला यासंबंधी राज्य आणि वरिष्ठ पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस जारी करण्याचा निर्देश दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. याप्रकरणी न्यायालयाने जयंत नारायण चटर्जी यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. संदेशखालीमध्ये मागील काही दिवसांपासून महिलांकडून याप्रकरणी तीव्र निदर्शने केली जात आहेत.
कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी संदेशखालीमध्ये लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश रद्दबातल ठरविला आहे. संदेशखालीच्या दोन रहिवाशांनी एक याचिका दाखल करत क्षेत्रातील जमावबंदी हटविण्याचा निर्देश न्यायालयाने द्यावा अशी मागणी केली होती. 9 फेब्रुवारी रोजी ममता बॅनर्जी सरकारकडून संदेशखालीमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करत इंटरनेट सेवा रोखण्यात आली होती.
ही घटना लज्जास्पद : अधिकारी
संदेशखालीत जे काही घडले ते पश्चिम बंगालसाठी लज्जास्पद आहे. ही एक निंदनीय घटना आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी असे भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने संदेशखालीच्या घटनेची यापूर्वीच दखल घेतली आहे. आयोगाने प्रशासनाला तीन दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला आहे. तसेच आयोगाने भारतीय घटनेच्या अनुच्छेद 338 अंतर्गत याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक महिलांकडून निदर्शने
संदेशखालीमध्ये स्थानिक महिला सातत्याने निदर्शने करत आहेत. तृणमूल नेते शेख शाहजहां तसेच त्याच्या सहकाऱ्यांवर जमिनी बळकाविण्याचा आणि लैंगिक शोषण करण्याचा आरोप या महिलांनी केला आहे. महिलांनी शेख शाहजहांच्या अटकेची मागणी केली आहे. मागील महिन्यात ईडीने शाहजहांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान शाहजहांच्या समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. तेव्हापासून शाहजहां हा फरार आहे.