दुहेरी नागरिकत्वाचा गुंता सोडविण्यास सरकार प्रयत्नशील
पणजी : गोव्यात सद्या दुहेरी नागरिकत्वाचा विषय गोवेकराना भेडसावत आहे. परंतु दुहेरी नागरिकत्वाचा विषय सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असून, दुहेरी नागरिकत्वाचा विषय भारत सरकारच्या मदतीने सोडवला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. पणजी येथे आयोजित ग्लोबल गोवन असोसिएशनच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. पुढील वर्षी गोव्यात ग्लोबल गोवन परिषदेचे आयोजन केले जाईल. यात जगभरात असलेल्या गोमंतकीयांनी भाग घ्यावा असे, आवाहनही त्यांनी केले. ग्लोबल गोवन असोसिएशनचे अध्यक्ष सायमन डिसिल्वा, एनआयआर आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फरेरा उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याच्या विकासात विदेशात राहणाऱ्या गोमंतकियांचे योगदान मोठे आहे. त्याना भेडसावणाऱ्या पासपोर्ट सरेंडर, ओयेसीस कार्ड व दुहेरी नागरिकत्व हे विषय केंद्र सरकारकडे मांडून त्या सोडवण्यासाठी आपले सरकार सक्रियपणे काम करत आहे. जगभरातील गोवेकराना एका छताखाली आणण्याचे काम ग्लोबल गोवन्स संघटना करणार आहे. असे सांगून प्रत्येक व्यक्तीने हृदय व मन यांचा संगम कऊन निस्वार्थीपणे काम केल्यास गोव्याचा विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.
90 टक्के जमिनी वाचविण्यात यश
राज्यातील विदेशात असलेल्या गोवेकरांच्या जमिनी बनावट कागदपत्रे करून विकण्याचे अनेक प्रकार घडले होते. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासानंतर, राज्यातील जमीन हडपण्याचे प्रकार 90 टक्के थांबले आहेत. ते शंभर टक्के रोखण्यासाठी आमच्यात समन्वय आवश्यक आहे. अनेकांना या प्रकरणी पथकाने अटक केली. अनेकांच्या जमिनी परत मिळणार आहेत. अद्याप काहींचा तपास सुरू आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले आहे. काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, अॅड. नरेंद्र सावईकर यांचीही भाषणे झाली.