देशाची पूर्ण यंत्रणा 3-4 लोकांच्या अधीन
राहुल गांधींचा आरोप : उर्वरित जनता महागाईमुळे त्रस्त
वृत्तसंस्था/ कोरबा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी छत्तीसगडच्या कोरबा येथे पोहोचली. राहुल गांधी का थकत नाहीत अशी विचारणा लोक करतात, जनता माझ्यावर प्रेम करत असल्यानेच मी थकत नसल्याचे उद्गार राहुल यांनी काढले आहेत. भाजप सरकारच्या काळात देशाची पूर्ण यंत्रणा केवळ 3-4 लोकांसाठी राबविली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
भाजप सरकारने नोटाबंदी केली, मग जीएसटी लागू केला, सरकारच्या या निर्णयांमुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त झाले. प्रत्येक क्षेत्राला काही लोकांमध्ये विभागण्यात येत आहे. देशात ऊर्जा, संरक्षण, आरोग्य, रिटेल, विमानतळ यासारख्या कुठल्याही क्षेत्रात आता मोजकेच लोक दिसून येतात. म्हणजेच पूर्ण यंत्रणा 3-4 लोकांसाठी राबविली जात आहे. उर्वरित जनता महागाईने त्रस्त झाली आहे. हाच आर्थिक अन्याय असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
देशात सर्वसामान्यांच्या मेहनतीचा पैसा भांडवलदारांच्या कंपन्यांमध्ये गुंतविण्यात येत आहे. या कंपन्यांमध्ये दलित-मागास नाहीत. देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये दलित-मागासांची भागीदारी नाही. भाजप हिंदू राष्ट्राबद्दल बोलत असताना मागास, दलित आणि आदिवासींच्या पदरी काहीच पडत नाही. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देखील एकही गरीब-मजूर शेतकरी दिसून आला नाही असा दावा राहुल यांनी केला.
इंडिया आघाडी विखुरली जात असल्याने आणि विविध राज्यांमधील काँग्रेस नेते भाजपमध्ये दाखल होत असल्याने राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता आटोपती घेतली जाणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेचा उत्तरप्रदेशातील कालावधी कमी करण्यात आल्याचे समजते.