तिलारी कालव्याचा दरवाजा अडकला
दरवाजा उघडेपर्यंत गोव्याचा पाणीपुरवठा राहणार बंद : तज्ञांकडून प्रयत्न सुरू
साटेली भेडशी : तिलारी धरणाच्या कालव्यात उघडणारा दरवाजा पाण्याच्या प्रचंड दाबामुळे अडकून पडला आहे. तो उघडण्याचे प्रयत्न गेले दोन दिवस सुरू असून तो दरवाजा उघडेपर्यंत गोव्यात होणारा पाणीपुरवठा थांबलेला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या पर्वरी व साळगावला पाण्यावाचून तहानलेले रहावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून गोवा व महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे तिलारी धरणातील कालव्यातून गोव्यात होणारा पाणीपुरवठा बंद होता. गोव्यातील कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पाणीपुरवठा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वर्षाच्या आगमनासाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांसाठी गोवा राज्य सज्ज असून याकरिता पाण्याची मोठी गरज आहे. त्यामुळेच पाण्याचा पुरवठा कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा कायम आहे. तसेच हे पाणी सोडल्यानंतरही ते पर्वरीत पोचण्यासाठी तीन ते चार दिवस लागणार असल्याने पर्वरी जलशुद्धिकरण प्रकल्प सुरू होण्यास नवे वर्ष उजाडू शकते काय? अशी भीती व्यक्त होत आहे.
तांत्रिक अडथळा काय?
गोवा जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले की, कालवा दुऊस्तीवेळी गेल्या महिन्यात धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला होता. त्यावर दोन हजार टन पाण्याचा दाब पडल्याने तो दरवाजा थोडा दबला असावा. त्यामुळे मोटरचा वापर करूनही तो दरवाजा उघडला जात नाही. त्यासाठी जास्त प्रयत्नही करता येत नव्हते. कारण दरवाजा उघडण्यासाठीच्या केबल तुटल्या तर त्या घालण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला असता. अखेरीस दरवाजा उघडण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान जाणणारे तंत्रज्ञ पुणे येथून मागवावे लागले आहेत. रविवार, सोमवार दिवसभर त्यांनी धरणाच्या दरवाजाची पाहणी केली. दरवाजा वर उचलण्यासाठी यंत्रसामग्री मागविण्यात आली आहे. ती सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तिलारी धरण परिसरात पोचणे अपेक्षित होते. मात्र, रस्त्यावरील काही अडथळ्यांमुळे रात्री एक वाजता ती यंत्रसामग्री पोचली आहे. आता रात्रभर तो दरवाजा उघडण्याचे प्रयत्न करण्यात येतील. मंगळवारी सकाळपर्यंत दरवाजा उघडला जाणे अपेक्षित आहे. मात्र, मंगळवारी उशिरापर्यंत दरवाजा उघडण्याच्या कामाला यश आले नाही.