काँग्रेसकडूनच देशाचा विकास
उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार
बेळगाव : काँग्रेस पक्षाकडून देशातील शेतकरी गोरगरीब विशेष करून महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन अनेक योजना राबविल्या आहेत. राज्यात पाच गॅरंटी योजना राबवून सरकार गोरगरिबांच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले आहे. यासाठी येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ देऊन आपल्याला निवडून देण्यात यावे, असे आवाहन चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. रायबाग विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कंकणवाडी व कुडची मतदारसंघात येणाऱ्या मुगळखोड व हिडकल येथे प्रचार करून त्या बोलत होत्या. काँग्रेस पक्षाचे तत्कालीन पंतप्र्रधान पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. तर सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसकडून पाच गॅरंटी योजना जारी करून गरिबांचे कल्याण साधले जात आहे. त्या प्रमाणे केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करून गॅरंटी योजनांची पूर्तता केली जाईल. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
विकासासाठी काँग्रेस पक्षाला साथ द्या
निवडून आल्यानंतर मतदारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना योग्य धडा शिकविण्याची हीच वेळ आहे. मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेल्या खासदारांना धडा शिकविण्यात यावा. चिकोडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावाच्या विकासाला प्राधान्य देऊन विकास साधला जाईल, असे त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य याला प्राधान्य देऊन तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावला जाईल. कौशल्य विकास करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य सुरूच असून या भागातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयन करू, असे आश्वासन त्यांनी दिले. विद्यमान खासदारांनी या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष करून अन्याय केला आहे. भविष्यातील विकासासाठी काँग्रेस पक्षाला साथ देण्यात यावी, असे आवाहन उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले.