सहकार चळवळ हीच अर्थव्यवस्थेचा खऱ्याअर्थाने मुख्य कणा
प्राध्यापक पी. डी. पाटील यांचे प्रतिपादन : सावगाव येथील ओमकार को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा रौप्यमहोत्सव उत्साहात
वार्ताहर /उचगाव
सहकार चळवळ हीच अर्थव्यवस्थेचा खऱ्याअर्थाने मुख्य कणा आहे. सहकार चळवळ ही सातत्याने जोमात चालली पाहिजे. ज्या दिवशी सहकार चळवळ थांबेल, त्यावेळी अर्थव्यवस्था डळमळीत होईल. सहकारी संस्था माणसे जगविण्याचे आज खऱ्या अर्थाने काम करत आहेत. गोरगरीब, होतकरू, गरजूंना वेळेत पैसा दिला तर तो सत्कारणी लागेल, असे मनोगत महात्मा फुले ज्युनियर कॉलेज महागावचे प्राध्यापक पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले. सावगाव येथील ओमकार को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या समारंभप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून पी. डी. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन नारायण कडलीकर व संस्थापक व्हा. चेअरमन नारायण पाटील होते.
सोसायटीच्या घोडदौडीचा आढावा
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, शिवकुमार शहापूरकर यांनीही विचार मांडले. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन नारायण कडलीकर म्हणाले, संस्था सुरू केल्यापासून आजतागायत आम्ही संचालक मंडळाला महत्त्व दिले नाही. तर सोसायटी आणि तिचे कामकाज, सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी वर्ग यांना महत्त्व देऊन मोठी करण्याचा संकल्प केला. तो आज खऱ्याअर्थाने यशस्वी होताना आम्हाला आनंद होत आहे. प्रास्ताविकात संचालक मनोहर कदम यांनी 1997 पासून सुरू केलेल्या ओमकार या नावाखाली दूध संस्था ते 1998 साली ओमकार सोसायटी ते आजतागायत सोसायटीच्या माध्यमातून केलेल्या घोडदौडचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेऊन मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सोसायटीचे संचालक मारुती कदम, मल्लाप्पा बसरीकट्टी, गजानन सुतार, बसवंत पाटील, गीता काकतकर, अर्जुन पवार, शिवाजी मेदार, समिधा सावगावकर, सल्लागार निंगाप्पा मोरे, गजानन पावशे, नारायण काकतकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोसायटीच्या सर्व सभासदांना बॅग भेटवस्तू देऊन मान्यवराच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी या भागातील अनेक गावातील पतसंस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन तसेच युवक मंडळ, विविध संस्थांच्यावतीने संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील जयभारत सोसायटीचे माजी चेअरमन बाळकृष्ण नेसरकार, सह्याद्री सोसायटीचे कणबरकर यासह अनेक सोसायटींचे संचालक या समारंभाला उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी शिंदे व अमृत वेताळ यांनी केले. सेक्रेटरी राजू कदम यांनी आभार मांनले.
‘तरुण भारत’चे अभिनंदन
दिनेश ओऊळकर म्हणाले, केंद्र शासनालादेखील सहकाराचे महत्त्व पटू लागले आहे. सहकारातून समृद्धी या योजनेअंतर्गत देशात सहकाराचे विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. 153 योजना या सहकार तत्त्वाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देऊन ‘तरुण भारत’ने या सोसायटीच्या रौप्यमहोत्सव प्रसंगी सुंदर असा सहकारावरती लेख छापून जनतेच्या ज्ञानात सहकाराबद्दल घातलेल्या माहितीबद्दल ‘तरुण भारत’चे त्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.