पंतप्रधानांच्या भाषणाची आयोगाकडून चौकशी सुरू
काँग्रेस, माकपकडून तक्रारी दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या भाषणाविरोधात दाखल झालेल्या तक्रारींची निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय-एम) पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यात पंतप्रधान मोदींनी काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या मालमत्तेची मुस्लिमांमध्ये वाटणी करेल असा आरोप केला होता.
पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत दाखल झालेल्या तक्रारींचा विचार आयोगाकडून केला जात असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आयोगाकडे 140 पानांत 17 तक्रारी केल्या आहेत. पंतप्रधान मोदींवर ठोस कारवाई करावी, अशी विनंती काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फूट पाडणारी आणि द्वेषपूर्ण विधाने करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यासह अन्य 15 मुद्यांवर तक्रार केली. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी आणि गुरदीप सप्पल यांचा समावेश होता. दुसरीकडे, माकपने राजस्थानमधील मालमत्तेच्या वितरणाबाबतच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याबरोबरच दिल्ली पोलीस प्रमुखांकडे तक्रार पाठवली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे.