ठाकरे ब्रँण्ड टिकविण्याचे आव्हान
महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने एक चर्चा होत असते, ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्र येण्याची, त्यांच्या आजूबाजूचे नेते, कार्यकर्ते किंवा नातेवाईक याबद्दल अधूनमधून सूचक वक्तव्य करत असतात. मुंबईत मराठी माणसाच्या अस्तित्वाबाबतचा प्रश्न निर्माण झाला की, ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची गरज असल्याचे बॅनर मुंबईत झळकतात. मात्र आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याबाबत उघड भाष्य केले आहे. त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का? आले तर युती करणार की एकाच संघटनेत लढणार? महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातासमोर अनेक प्रादेशिक पक्षांचा पालापाचोळा झाला, जे छोटे मोठे पक्ष भाजपसोबत गेले त्यांनी त्यांचे अस्तित्व जरी ठेवले असले तरी त्यांना भाजपच्या कलेनेच घ्यावे लागत आहे. महाराष्ट्रात 2014 च्या मोदी लाटेनंतर सर्वाधिक फटका हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यानंतर मनसे या प्रादेशिक पक्षाला बसला. आता तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शकले झाली आहेत, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जर राजकारणात कोणाच्या राजकीय अधपत:नाची चर्चा सर्वाधिक होत असेल तर ती ठाकरे बंधुंची. राज ठाकरे स्वत:च्या मूलाला निवडून आणू शकले नाहीत तर उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांचा वारसा सांभाळता आला नाही, या बरोबरच चर्चा होते ती ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची आणि ठाकरे ब्रॅण्ड टिकविण्याची. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यापूर्वीही अशा चर्चा अनेकवेळा झाल्या मात्र यावेळी दोन्ही बंधुंनी याबाबत उघड भाष्य केले असल्याने या चर्चेचे गुऱ्हाळ पुढे सुरू झाले आहे.
9 मार्च 2006 ला राज ठाकरे यांनी मनसे या पक्षाची स्थापना केली. आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने कधीच कोणाशी निवडणूकपूर्व युती केलेली नाही. कधी बिनशर्त तर कधी सशर्त पाठिंबा देण्याचे काम मनसेने केले. त्यात महत्त्वाचे म्हणजे उध्दव ठाकरे जेव्हा भाजपसोबत होते, तेव्हा राज यांनी भाजप विरोधात तर काँग्रेससोबत होते तेव्हा काँग्रेसच्या विरोधात राज ठाकरे यांनी आपली भूमिका घेतली. त्यामुळे हा भावकीचा वाद दर निवडणुकीत बघायला मिळाला, या वादाने महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे नुकसान होत असल्याची भावना निर्माण झाली. मनसे पक्षाची स्थापना झाल्यानंतर 2009 ला झालेल्या पहिल्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपला करीष्मा दाखवला.
राज यांच्या मागे मराठी मतदार एकजुटीने उभा राहिल्याने 2009 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना -भाजपला सहापैकी एकही जागा मिळाली नाही तर, विधानसभा निवडणुकीत मनसेला मुंबईत शिवसेनेपेक्षा दोन जागा अधिकच्या मिळाल्या. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाची ही निवडणूक होती, यावेळी बाळासाहेबांनी मराठी माणसाने शिवसेनेशी गद्दारी केल्याचे या निकालानंतर सांगितले होते. 2009 नंतर झालेल्या निवडणुकामंध्ये मात्र मनसेचा आलेख हा सातत्याने खाली आलेला बघायला मिळाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर मनसेला आपले खातेही खोलता आले नाही तर दुसरीकडे अमित ठाकरे यांच्या पराभवाची पण चर्चा झाली. तर उध्दव ठाकरे यांनी 2014 ला स्वबळावर लढताना 63 जागा तर 2019 मध्ये भाजपबरोबर युती करून 56 जागा जिंकल्या, आज तो पक्ष तर एकनाथ शिंदेकडे गेला मात्र ठाकरे गट हा केवळ 20 जागांवर येऊन ठेपला आहे. आता ठाकरे बंधु एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, जर ठाकरे बंधु एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत नक्कीच बदलेल आणि याचा सगळ्यात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसणार हे नक्की.
भाजपची स्वत:ची मतपेटी आहे, मुंबई महापालिकेचा विचार करता ठाकरे बंधु एकत्र आल्यास मराठी माणसाची मते ही सरसकट ठाकरे बंधुंच्या युतीला मिळणार हे नक्की. मुंबई महापालिका निवडणूक लढवायची असेल तर ठाकरे आडनाव हे वापरावेच लागते. त्याशिवाय मुंबईत निवडणूक जिंकता येत नाही. यामुळेच की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची भेट घेतली असेल, मात्र अमित ठाकरे यांचा माहिम विधानसभा मतदार संघातून झालेला पराभव, अमित ठाकरेंच्या निवडणुकीवेळी शिंदे गटाने घेतलेली आडमुठी भूमिका, यामुळे ज्याला मुलाने पाडले त्यांच्यासोबत राज ठाकरे युती करण्याची शक्यता कमीच आहे.
मनसे-शिवसेना युतीबाबत ठाकरे बंधुंनी उघड भाष्य केले असले तरी, दोन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते हे मात्र युती न होण्याच्या भूमिकेत आहे, राज यांनी शिवसेना सोडताना माझा वाद हा विठठ्लाशी नसुन आजुबाजुच्या बडव्यांशी आहे असे वक्तव्य केले होते. आज दोन्ही पक्षात बडवे आहेत. ही युती झाली काय आणि नाही झाली तरी भाजपला काही फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन आता पाच महिने होत आले तरी जनतेच्या मनाचा ठाव फडणवीस घेताना दिसत नाहीत तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा जनतेच्या मनावर असलेला प्रभाव काही कमी होताना दिसत नाही. मुंबईत अजुनही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचाच आवाज कायम असल्याचे दिसले. आता मुंबई महापालिका निवडणूकच अशी असेल जी खरी शिवसेना कोणाची हे दाखवून देईल, मात्र त्यापूर्वीच ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा रंगल्याने शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या काळातही पक्ष फुटला, कधी मोळी ढिली झाली विस्कटली पण बाळासाहेबांनी शिवसेनेला कधी संपू दिले नाही. जे नेते फुटले त्यांचा योग्य तो समाचार त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत घेतला. मात्र आता बाळासाहेबांसारखा दरारा राहिला नाही. आता तर ठाकरे ब्रॅण्डच महाराष्ट्राच्या राजकारणातून संपतो की काय अशी राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे संघटन कौशल्य आणि राज ठाकरे यांचा करीष्मा बघता, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातील पोत नक्कीच बदलल्याचे बघायला मिळेल. ठाकरे ब्रॅण्ड टिकवण्यासाठी हे नेते खरंच एकत्र येणार का? आले तर युती करणार की एकाच संघटनेत लढणार? की महापालिका निवडणुकीत एकमेकांना मदत करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रवीण काळे