केंद्र सरकारच्या कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार
आजपासून परिक्रमा अभियानाला प्रारंभ : पंधरा गावांमध्ये पुढील महिन्यासाठी जागृती कार्यक्रम
बेळगाव : केंद्र सरकारच्या कृषीविषयक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप रयत मोर्चातर्फे सोमवार दि. 12 फेब्रुवारीपासून अभियान राबविले जाणार आहे. संपूर्ण देशभर राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचा भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातील पंधरा गावांमध्ये पुढील एक महिना कालावधीसाठी परिक्रमा तसेच जागृती कार्यक्रम केला जाणार असून, यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशी माहिती भाजपचे नेते एम. बी. जिरली यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारकडून फसल बिमा योजना, किसान सन्मान निधी, सिंचन योजना, निर्यात योजना, नुकसानभरपाई असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याविषयी माहिती नसल्याने ते या योजनेपासून वंचित रहात आहेत. यासाठी प्रत्येक गावात जाऊन केंद्र सरकारच्या कृषीविषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर भाजप व काँग्रेसने अंमलबजावणी केलेल्या कृषी योजनांची तुलनात्मक माहितीही दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेवेळी भाजपच्या रयत संघाचे अध्यक्ष सुभाष पाटील, दुंडाप्पा भेंडवाडे, बसवराज कुंदगोळ, कल्लाप्पा शहापूरकर, शरद पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.