‘प्रवाह’कडून गोव्याला वाटण्याच्या अक्षता
गोव्याच्या मागणीकडे केले दुर्लक्ष : सरकार स्मरणपत्र पाठवणार
पणजी : म्हादई प्रश्नावर केंद्र सरकारने नेमलेल्या ‘प्रवाह’ या प्राधिकरणाने गोवा सरकारतर्फे करण्यात आलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले असून गेल्या चार ते पाच महिन्यात ‘प्रवाह’कडून गोवा सरकारला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकात करण्यात आलेल्या बांधकामांची पाहणी करावी अशी मागणी ‘प्रवाह’कडे गोवा सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये केली होती. त्यास साधे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखवण्यात आलेले नाही तसेच ‘प्रवाह’कडे पाठवलेल्या वरील मागणीच्या पत्राची पोचपावती देखील देण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘प्रवाह’ प्राधिकरण नेमके कशासाठी? कोणासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात आता राज्य सरकारने ‘प्रवाह’ला पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवण्याचे ठरविले आहे.
‘प्रवाह’ने या आधी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात जाऊन विविध ठिकाणी भेटी दिल्या. तेथे जाऊन पाहणी केली परंतु गोवा सरकारने कणकुंबी येथे कळसा-भांडुरा प्रकल्पाची पाहणी करण्याची मागणी मात्र ‘प्रवाह’ने मान्य केली नाही. त्यासाठी केंद्रीय जल आयोगाची मान्यता व कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल असे ‘प्रवाह’तर्फे सूचित करण्यात आले होते. परंतु त्याबाबत काहीच हालचाली न झाल्याने गेल्या ऑगस्ट महिन्यात ‘प्रवाह’कडे पुन्हा एकदा कणकुंबी व इतर ठिकाणी तपासणीची मागणी करण्यात आली होती. त्यावर ‘प्रवाह’कडून काहीच उत्तर आलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ‘प्रवाह’ गोवा सरकारची मागणी टाळत असल्याचे दिसून येत असून त्यासाठी पुन्हा एकदा ‘प्रवाह’ला जागे करण्याचे ठरविले आहे.