निधीवाटपात अन्यायाचा आरोप फेटाळला
गलिच्छ राजकारण असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारकडून बिगरभाजप शासित राज्यांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला स्थगिती दिली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी भूमिका मांडली आहे. अशाप्रकारचा आरोप म्हणजे गलिच्छ राजकारण असून स्वत:च्या स्वार्थाकरता विरोधी पक्ष हे आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर सीतारामन यांनी दिले आहे.
कर्नाटक सरकारने केंद्र सरकारवर योग्य प्रमाणात निधी न पुरविल्याचा आरोप केला होता. यासंबंधी लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी एक प्रश्न विचारला होता. याच्या उत्तरादाखल सीतारामन यांनी निधीवाटप प्रणाली चांगल्याप्रकारे कार्यरत असल्याने भेदभाव होऊच शकत नसल्याचे म्हणत केंद्र सरकार वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
काही राज्यांसोबत भेदभाव होत असल्याचा दावा केवळ राजकीय स्वार्थापोटी केला जात आहे. स्वत:चा स्वार्थ साधू पाहणारे लोकच अशाप्रकारचे आरोप करत असतात. कुठलाही केंद्रीय मंत्री वित्त आयोगाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. एखादा अर्थमंत्री हे राज्य मला पसंत नसल्याने त्याचा निधी रोखावा असे म्हणू शकत नाही. निधीवाटप प्रणाली अत्यंत चांगल्याप्रकारे स्थापित करण्यात आली असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.
कर्नाटकसोबत पश्चिम बंगाल सरकारने देखील केंद्र सरकारवर निधीवाटपात अन्याय केल्याचा आरोप केला होता. यासंबंधी काँग्रेस खासदाराने केलेले वक्तव्य अत्यंत वादग्रस्त ठरले होते.