नदी-नाल्यांचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्याचा उद्देश
आमदार अरविंद पाटील यांचे वक्तव्य : जळगे येथे सत्कार समारंभ
वार्ताहर/नंदगड
मी आमदार असताना तालुक्यांच्या काही गावातील तलावांची खोलबंदी केली. त्याचा लाभ शेतीसाठी तर झालाच. शिवाय मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी होत आहे. वाया जाणारे तट्टीनाल्याचे पाणी घोमारी तलावात एकत्रित करण्याची मोठी योजना राबवली. या पाणी योजनेमुळे गस्टोळी, भुरूणकी, कक्केरी भागातील सुमारे 600 एकर जमीन ओलिताखाली आली आहे. पाण्यामुळे येथील शेती हिरवीगार झाली आहे. आजही लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा अनेक पाणी योजना तालुक्याच्या विविध गावात राबवून नदी, नाल्यांचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश असल्याचे वक्तव्य माजी आमदार अरविंद पाटील यांनी केले.
जळगे ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार अरविंद पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पाचव्यांदा संचालक म्हणून निवडून आले. तर अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल नंदगड मार्केटिंग सोसायटीवरही पाचव्या वेळी निवडून आल्याबद्दल जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अरविंद पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर कृषी पत्तीनचे संचालक संभाजी पाटील होते. यावेळी सूर्याजी पाटील, मालोजी पाटील, गंगाराम निलजकर, नितिन पाटील, नामदेव पाटील, विलास निलजकर, आप्पाणा पाटील, विजय गुरव, पुंडलिक लाड आदीनी विचार मांडले. या कार्यक्रमाला गावातील अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या.