शिवाजी महाराज पुतळा रक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी
आमदार सिल्वा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मडगांव : पाद्रीभाट-सां जुझे द अरियालमध्ये शांती प्रस्थापित करावी तसेच धार्मिक सलोखा जपणे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या रक्षणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन वेळ्ळीचे आमदार व्रुझ सिल्वा यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए. यांना सादर केले आहे. दरम्यान, या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आमदार व्रुझ सिल्वा यांनी सां जुझे दी अरियालच्या पंच व स्थानिकांसह जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए. यांची काल मंगळवारी भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. बेनाभाटमध्ये पुतळा बसवण्याला ग्रामस्थांचा विरोध नाही. पण, पंचायतीच्या परवानगीशिवाय जमिनीच्या योग्य कागदपत्रांशिवाय हा प्रकार घडल्याने नागरिकांकडून विरोध झाला. शिवरायांचा पुतळा बसवलेली जागा निर्जन असून त्याठिकाणी वीज किंवा वसाहत नाही. पुतळा बसवण्याची परवानगी उपजिल्हाधिकारी व पोलिसांकडून देण्यात आल्याने त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी. काही अनुचित प्रकार घडल्यास ग्रामस्थांवर किंवा आमदारांवर आरोप केले जाऊ नयेत, असे सांगतानाच या जागेची पाहणी करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केल्याचे आमदार सिल्वा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले