तुरमुरी, उचगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
रेबीज प्रतिबंधक लस देण्याची मोहीम महानगरपालिका कधी सुरू करणार?
वार्ताहर/उचगाव
तुरमुरी कचरा डेपोमुळे तुरमुरी, उचगाव परिसरात हजारो भटक्या कुत्र्यांचे कळप भटकत असतानाचे चित्र पहावयास मिळते. या भागातील जनता भटक्या कुत्र्याच्या भीतीच्या छायेखाली वावरत असते. बेळगाव महानगरपालिकेच्या कचऱ्यामुळेच ही आपत्ती या भागातील जनतेवर ओढवलेली आहे. बेळगाव शहरातील कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्याची मोहीम राबविली जात आहे. बेळगाव शहरातील कचऱ्यामुळे या भागातही भटक्या कुत्र्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. मग तुरमुरी उचगाव परिसरातील भटक्या कुत्र्यांना लस देण्याची मोहीम महानगरपालिकेकडून का राबविली जात नाही? असा संतापजनक प्रश्न या भागातील हजारो नागरिकांतून करण्यात येत आहे. कोणाचा तरी कचरा, कोणाची तरी घाण आणि त्रास मात्र येथील नागरिकांना, हे चित्र कधी बदलणार, असा प्रश्न सातत्याने या भागातील जनता विचारत असते. ही परिस्थिती बेळगाव शहरातील कचऱ्यामुळे तुरमुरी, उचगाव परिसरात निर्माण झाली आहे. या कचऱ्यामुळे हजारो कुत्र्यांचे कळप उचगाव, तुरमुरी, कोणेवाडी, बाची, बसुर्ते या भागात भटकताना दिसतात.
या संपूर्ण भागात शेतकरी शेतात महिलावर्ग काम करत असताना या शेतवडीत झाडांच्या खाली ही भटकी कुत्रे पडून असतात. शेतकरी महिलावर्ग शेतात काम करताना ही भटकी कुत्री या महिला व शेतकऱ्यांवर हल्ला करतात अनेक वेळा जखमी होण्याच्या मोठ्या घटनाही या भागात घडलेल्या आहेत. मात्र विचारणार कोणाला, कुत्र्याने चावल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन स्वत: खर्च करून स्वत:च उपचार करून घेणे आणि जीव वाचविणे एवढी प्रथा या भागात झालेली आहे. महानगरपालिकेच्या कचऱ्यामुळे या भागात कुत्र्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होते मात्र महानगरपालिका याकडे ढुंकूनही पाहत नाही. बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्याची मोहीम महानगरपालिकेने सुरू केली आहे. मात्र तुरमुरी, उचगाव परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झालेल्या या पैदासीवर महानगरपालिका का विचार करत नाही, त्यांना रेबीज प्रतिबंधक लस का देत नाही, असाही प्रश्न या भागातील जनतेतून करण्यात येत आहे. बेळगाव महानगरपालिकेने तातडीने याची दखल घेऊन या संपूर्ण परिसरातील भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देऊन नागरिकांच्या जीवावर होणारे हल्ले, धोके थांबवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.