अदानीला वीजनिर्निमितीची निविदा नियमानुसारच
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती
प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्रात 6600 मेगावॅट वीजनिर्मितीसाठी महावितरणकडून राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया अदानी समूहाने नियमानुसारच मिळवली आहे. नुसती टीकाटिप्पणी करण्याआधी टीका करणाऱ्यांनी काही चुकीचे झाले असेल तर ते समोर आणावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात 6600 मेगावॅट वीजनिर्मितीसाठी महावितरणकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेनुसार अदानीने ही बोली जिंकली असल्याचे समोर आले असून पुढच्या 25 वर्षांसाठी अदानी समुहाकडून राज्याला वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून काँग्रेसने महायुतीवर निशाणा साधला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी महायुती सरकारची अदानींवर कृपादृष्टी असल्याची टीका केली. तसेच राज्यातील महायुती सरकार दारूण पराभवाकडे झुकते आहे. त्यामुळे शेवटच्या घटकेत ते हेच करणार, असे देखील त्यांनी म्हटले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टोक्ती देत काँग्रेसला टोला लगावला.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना नियमांचे पालन करत अदानी समूहाने निविदा मिळवली असल्याचा दावा अजित पवार यांनी केला. ते म्हणाले, नुसती टीका टिप्पणी करण्याआधी टीका करणाऱ्यांनी काही चुकीचे झाले असेल तर ते समोर आणावे. या निविदेमध्ये काही गोष्टी या जाणीवपूर्वक डावलल्या गेल्या, हे त्यांनी दाखवावे. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कंपनीबद्दल एखाद्या पक्षाला आकस असेल किंवा त्यांची नाराजी असेल तर त्यांना ती नाराजी बोलून दाखवण्याचा अधिकार आहे. पण त्याबाबतचे पुरावेही हवेत.
काँग्रेसची महायुतीवर टीका
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटवरद्वारे टीका करताना म्हटले आहे की, महायुती सरकार मोठ्या पराभवाला सामोरे जाणार असताना अखेरच्या काही दिवसामध्ये त्यांनी हे घडवून आणले आहे. आणखी एक ‘मोदानी एन्टरप्रायझेस’ आहे. या व्यवहारात मोठा गोंधळ असून ते कालांतराने उघड होईल, अशी टीका त्यांनी केली.