विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच उतरले रस्त्यावर
अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय : गुंजी-खानापूर अतिरिक्त बसफेरी वाढवण्याची मागणी
खानापूर : खानापूर-लोंढा या मार्गावरील अपुऱ्या बससेवेमुळे या भागातून खानापूर आणि बेळगावला शिक्षणासाठी येणाऱ्या माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा, महाविद्यालयांची वेळ सकाळचीच असल्याने सकाळी 8 वा. जटगा ते खानापूर ही बस विद्यार्थ्यांनी गुंजीलाच पूर्णत: भरते. त्यामुळे पुढील नायकोल, माणिकवाडी सावरगाळी, शिंदोली, गंगवाळी, होनकल या गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही.
त्यानंतर त्याना 9:30 वाजता येणाऱ्या करंजाळ-खानापूर बसची वाट पहावी लागते. त्यामुळे करंजाळ बसवर अतिरिक्त ताण पडत असल्याने त्याही बसमध्ये सर्वाना प्रवेश मिळत नाही. परिणामी या गावातील विद्यार्थ्यांचे बसअभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी गुरुवारी शिंदोली ग्रा. पं. सदस्य प्रा. शंकर गावडा व प्रा. महंतेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी खानापूर बस आगारप्रमुखांना निवेदन देऊन सकाळी 8. 30 वा. आणि सायंकाळी 5.30 वाजता गुंजी ते खानापूर अतिरिक्त बस फेरी वाढवावी, अशी मागणी केली. याबाबत आगारप्रमुखांनी आपण योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.