गेळे येथील शिक्षकाने गळफास घेत संपविले जीवन
वार्ताहर/आंबोली
आंबोली- गावठणवाडी येथील जि. प. शाळा नं.६ येथे कार्यरत असणारे शिक्षक आनंद सुरेश कदम (३५ ) यांनी गेळे येथे राहत्या घरी खोलीतील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत शुक्रवारी दुपारी आत्महत्या केली. टी. ई. टी. परीक्षेत आपण पास होणार नाही अशी चिट्ठी लिहीत त्यांनी नैराश्यातून आपले जीवन संपविले. आत्महत्येपूर्वी कदम यांनी शुक्रवारी सकाळी आंबोली -गावठाणवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तेरसे यांच्याकडे शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड दिले. आपण आठ दिवस रजेवर जाणार आहोत असे सांगत हाफ डे टाकून ते शाळेतून निघून गेले. यावेळी ते अस्वस्थ दिसत होते अशी माहिती वाटेत त्यांना भेटलेल्या येणाऱ्या -जाणाऱ्यांनी दिली.दुपारी शाळेतून घरी गेल्यावर आनंद कदम आपल्या रूममध्ये गेले. आत्महत्येपूर्वी गडहिंग्लज येथून येणाऱ्या एका सहकारी शिक्षकाला , माझा फोन लागला नाही तर आपण माझी वाट पाहू नका. तुम्ही जा. असे फोन करून सांगितले. शुक्रवारी सकाळीच कदम यांचे आई-बाबा पुण्याला तर त्यांचे भाऊ आंबोली येथे कामाला गेले होते. तर भावजय घरात एकटीच होती. शुक्रवारी सायंकाळी जेव्हा मोठा भाऊ कामावरून घरी आला तेव्हा कदम यांच्या फोनची रिंग वाजत होती. त्यांनी फोन उचलला नाही म्हणून दरवाजा ठोठावला परंतु खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही . त्यानंतर कदम यांच्या खोलीच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता आनंद कदम हे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. कदम यांच्या पश्चात आई, वडील , भाऊ, भावजय असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार संतोष गलोले आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला.कदम यांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने कदम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे .