Sangli Crime : मारहाणीच्या रागातून डोक्यात घातला दगड; मायलेकींकडून भावाच्या खूनाची कबूली
संशयितांकडून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी खोटी माहिती देत मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न
सांगली (तासगाव) : वारंवार मारहाण करत असल्याच्या रागातून आई आणि बहिणीनेच तरुणाचा खून केला. मयूर रामचंद्र माळी (वय 30, रा. कासार गल्ली, तासगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताची आई संगिता रामचंद्र माळी (वय 50), बहिण काजल रामचंद्र माळी (वय 20, दोघीही रा. कासार गल्ली, तासगाव) यांना रविवारी अटक केली आहे. संशयितांनी खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी खोटी माहिती देत मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांना सोमवारी तासगांव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवार, 3 मे रोजी मयुर माळी याला त्याच्या घरी भाजल्याने उपचाराकरीता त्याचा भाऊ महेश माळी याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी मयुरचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी पाहणी केली असता मृताच्या डोक्यात जखम दिसून आली. तसेच डावा कान तुटलेला, नाक आणि तोंडातून फेस आल्याचेही दिसले. या जखमांमुळे संशय आल्याने याची माहिती पोलिसांनी वरिष्ठांना दिली.
घटनास्थळाचा पंचनामा आणि 'हे' हाती लागले...
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन इन्केस्ट पंचनामा केला. पोलिसांनी पाहणी केली असता आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांनी पाणी मारल्यामुळे घरात ओलावा होता. आगीत अर्धवट जळालेले कपडे इतर साहित्य होते. तसेच मयुर ज्या ठिकाणी मृतावस्थेत मिळून आला त्या ठिकाणी रक्तमिश्रीत पाणी आढळून आले. तसेच शेजारीच दोन वेगवेगळ्या आकाराचे दगड त्यावर रक्ताचे डाग मिळून आले.
यानंतर 2 मे रोजी रात्री ते 3 मे रोजी सकाळी मयूरच्या घरी कोण कोण होते याबाबत माहिती घेतली असता घरात आई, वडील, बहिण असल्याचे समजले. आई, बहिणीकडे चौकशी केली असता त्यांची मयतासोबत वारंवार भांडणे होत होती हे समजले. त्यावेळी मयत हा आई, बहिण यांना शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्यामुळे मयुरवर काजल आणि संगिता यांचा राग होता. खबऱ्यामार्फत पोलिसांनी माहिती घेतली असता या तिघांच्यामध्ये तंटा होत होता. त्यावेळी मयत मयुर त्यांना शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली.
...आई, बहिणीकडून खुनाची कबुली...
मयताची आई संगिता, बहिण काजलकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मयुरला गाढ झोप यावी यासाठी काजलने 2 मेच्या रात्री 10.30 वाजता पाण्याच्या बाटलीत जायफळची पावडर टाकुन ती मयुरजवळ ठेवली होती. 3 मे रोजी त्या दोघी उठल्यानंतर त्यांनी मयुरला आवाज दिला. मात्र तो उठला नाही. सकाळी 7.30च्या सुमारास मयुरच्या डोक्यात संगिताने दगड घालून, त्याचा खून केला. हे कृत्य कोणाला समजू नये म्हणून म्हणून त्या दोघींनी त्याचे कपडे टाकून त्यावर कापूर टाकून ते पेटवले. त्यानंतर 112 वर फोन करून घराला आग लागल्याची माहिती देऊन मदतीसाठी विनवणी केली. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.