विजेच्या समस्या दूर करा ,अन्यथा ग्रामस्थांसमवेत मोर्चा काढणार
आचरा सरपंच, सदस्यांनी दिला वीज वितरणला इशारा
आचरा प्रतिनिधी
आचरा गावामध्ये विद्युत पुरवठ्याबाबत समस्या निर्माण झालेल्या आहेत. आचरा गावात सबस्टेशन असूनही वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. समस्या त्वरित दूर न केल्यास आचरा गावातून ग्रामस्थांसमवेत वीज वितरणवर मोर्चा काढण्याचा इशारा आचरा गावचे सरपंच जेरोन फर्नांडीस व ग्रामपंचायत सदस्यांनी कणकवली येथील वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देत दिला आहे. यावेळी त्यासमवेत उपसरपंच संतोष मिराशी,सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, जयप्रकाश परुळेकर उपस्थित होते.
यावेळी सरपंच यांनी कणकवली कार्यालयात वीजवितरण अधिकारी यांच्या समोर समस्यांचा पाढाच वाचला यावेळी यांनी निवेदन सादर केले असून निवेदनातं म्हटले आहे कि आचरा हा गाव ०७ ते ०८ हजार लोकसंख्येचा गाव असून चार वायरमन पदे आहेत. त्यातील ०३ वायरमन तात्पुरत्या स्वरूपाचे असून ०१ महिला वायरमन कार्यालयीन काम पाहते व ०१ लाईनमन आहे. तो सर्व कामे करू शकत नाही. त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तो त्रास ताबडतोब दूर करावा व त्वरित जादा वायरमनची नियुक्ती करावी, पावसाळा सुरु झाल्यापासून दिवसातून बऱ्याच वेळा लाईट जाते, त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तो त्रास दूर करावा. गावातील बऱ्याच विद्युत लाईनवर झाडे वाढल्यामुळे व ती पावसाळ्यापूर्वी न तोडल्यामुळे लाईट स्पार्किंग होऊन लाईट बंद पडते. तसेच काही वेळा हायहोल्टेज होऊन काही ग्रामस्थांची घरातील विद्युत उपकरणे ना दुरुस्त झालेली आहेत, त्यामुळे त्यांना आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे रोज रात्रीची लाईट जाणे हि मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळे रात्रीची लाईट जाणार नाही याची व्यवस्था करावी. आचरा गावामध्ये तळेबाजारहून जोडलेली विद्युत लाईन कायम (फॉल्टी) नादुरुस्त होत असते. त्यामुळे आचरा गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तळेबाजारहून येणाऱ्या लाईनची दुरुस्ती त्वरित करून घ्यावी व ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी प्यावी, समस्या त्वरित दुर करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या रागाला नाहक सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.