वरवडेमधील वीज समस्या तातडीने सोडवा
सरपंचांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन
कणकवली /प्रतिनिधी
वरवडे गावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विजपुरवठा खंडीत होणे, कमी दाबाने विजपुरवठा होणे अशा समस्या उद्भवत आहेत. सातत्याने खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा पंपातही बिघाड होत आहे. तरी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी वरवडे सरपंच करूणा घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली.यावेळी उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली. यावेळी श्रीमती घाडीगांवकर यांच्यासोबत इब्राहीम शेख, आनंद घाडीगांवकर, सुभाष मालंडकर, अमोल घाडीगांवकर, मंदार मेस्त्री, सागर राणे, संतोष घाडीगांवकर आदी उपस्थित होते.
सातत्याने खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच पाणीपुरवठ्यातही अडचण निर्माण झाली आहे. तांबळवाडी येथे सिंगल फेज लाईनमुळे कमी दाबाने बिजपुरवठ होत असून ही श्रीफेज लाईन करण्यात यावी. तसेच बौद्धबाडी, मुस्लीमबाडी, देसाईवाडी व इतर भागातील ट्री कटींग न झाल्याने अनेक ठिकाणी फांद्या लागून अथवा लाईनवर पडल्याने विजपुरवठ्यात अडथळा येत आहे. यासाठी तातडीने ट्री कटींग करण्यात यावी. आवश्यक ठिकाणी स्पेसर बसविण्यात यावेत, आदी मागण्या करण्यात आल्या. पुढील आठवडाभरात जास्तीत जास्त समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन श्री. बगडे यांनी दिले.