For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरक्षण घेणारच...मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार! ५१ जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण

12:31 PM Dec 11, 2023 IST | Abhijeet Khandekar
आरक्षण घेणारच   मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार  ५१ जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण
Manoj Jarange Patil
Advertisement

उमरगा प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या उमरगा तालुक्यात रविवारी (दि.१०) येथील कै शिवाजीराव दाजी मोरे क्रीडा संकुल, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या भव्य सभेला लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी उपस्थिती लावत संपूर्ण मैदान भरुन आसपासच्या परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी उभा राहून सभा ऐकली. आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने झालेली ही एकमेव सभा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

Advertisement

उमरगा येथे होणारी सभा मनोज जरांगे पाटील यांचे जागोजागी होणाऱ्या स्वागतामुळे उशिरा सुरू झाली. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. सरकारने आरक्षण नाही दिले तर त्यांच्या छाताडावर बसून मराठे आरक्षण घेणारच. मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत संयम बाळगावा. २४ डिसेंबरपर्यंत कायदा पारीत होणार आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार, यात काही शंका बाळगू नका आणि जर आरक्षण नाही मिळाले व २४ डिसेंबरपर्यंत सरकारने निर्णय नाही घेतला तर मग मात्र आपल्याला सावध राहावे लागणार आहे, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, सत्तर वर्षात मराठा समाजाच्या पोरांना न्याय मिळाला नाही. मराठा समाज फक्त पुढाऱ्यांच्या सतरंज्या उचलत राहिला. पण राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना आरक्षणापासून दूर ठेवून अनेक सुविधापासून वंचित ठेवण्याचे काम केले. मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांपासून दूर राहावे. कुणबी जातीचे नोंदणीचे पुरावे सापडले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मराठा समाजाच्या तरुणांनी हिंसेपासून दूर राहून शांततेने आंदोलन करावे. माझ्या शेवटचा श्वासा पर्यंत आरक्षणासाठी लढा देणार आहे. केवळ मराठा आरक्षण हेच आपले ध्येय असले पाहिजे. या ध्येयापासून कोणीही दूर भटकवायचा प्रयत्न करु नये. येत्या २४ डिसेंबरपर्यत आरक्षण मिळणारच आहे. समाजाने एकसंघ राहून गावागावात जनजागृती करावी. विशेषत: महिलांनी गावागावात जावून जनजागृती करावी, असे आवाहन केले. मराठा समाज शांत आहे. त्यास शांतच राहू द्या. मराठा समाजातील लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही आरक्षण मागत आहोत. कोणावरही आम्ही अन्याय करत नाहीत. आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्ही आमच्या हक्काच मागत आहोत. शासनाने २४ डिसेंबरपर्यत याबाबत आपली जबाबदारी पार पाडावी व आरक्षणाचा विषय संपवावा, असे आवाहन केले.
मनोज जरांगे पाटील यांचे उमरगा शहरात आगमन होताच, ५१ जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलाची उधळण करत, जोरदार फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. या सभेस उमरगा, लोहारा तालुक्यासह कर्नाटकातील सीमावरती कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त लावला होता. यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय व जवळपासच्या पोलिस स्थानकातून दोनशे पोलीस कर्मचारी सभास्थळी व पार्किंग, वाहतूक नियोजनामध्ये व्यस्त होते. यावेळी शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने हातगाडी, फळ विक्रेत्यांचे गाडी रस्त्यावर नसल्यामुळे रहदारीस रस्ता मोकळा होता.

Advertisement

नेत्यांपेक्षा समाज एकवटणे आरक्षणाच्या हिताचे
आरक्षणासाठी महिलांनी एकजूट करुन महिलांमध्ये महिलांनी तर पुरुषांमध्ये पुरुष जनजागृती करणे गरजेचे आहे. मराठा समाजाने गावोगावी जाऊन जनजागृती करावी. आपल्या समाजाच्या ज्या नेत्याला आपण मोठे केले, पक्षाला मोठे केले अशा एकाही राजकारण्याने आपल्या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाही. यामुळे येणाऱ्या काळात नेत्यांपेक्षा समाज एकवटणे आरक्षणाच्या हिताचे असणार आहे.

Advertisement
Tags :

.